इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र केवळ जम्मू-काश्मीर व लडाखमध्येच

मुंबई : पहिलीपासून त्रिभाषा सूत्र देशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोनच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे, असे प्रतिपादन राज्य सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले आहे. त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचे की कोणत्या इयत्तेपासून करायचे, याबाबत समिती राज्यभरातील जनतेचा कौल ऑनलाईन पद्धतीसह विविध माध्यमातून अजमावणार असून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे आणि राज्यातील आठ शहरांमध्ये जनतेसह विविध संस्था-संघटनांशी चर्चाही करणार आहे.

राज्यात त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करण्याच्या शासन निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला. शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेने मोर्चाचा इशारा दिला आणि सरकारने तो शासननिर्णय रद्द करुन डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नियुक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे, माजी शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांनी शासननिर्णयाचे जोरदार समर्थन केले होते.

देशातील १७-१८ राज्यांमध्ये पहिलीपासून हे सूत्र लागू असल्याचा आणि राज्यातील विद्यार्थी अन्य राज्यांच्या तुलनेत क्रेडिट सिस्टीममध्ये मागे पडत असल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांनी दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. देशातील चार-पाच राज्यांमध्ये तिसरीपासून तर चार-पाच राज्यांमध्ये सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू असल्याची प्राथमिक माहिती आहे. देशातील अन्य राज्यांमधून त्रिभाषा सूत्राबाबतचा तपशील समितीने मागविला असल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.