मुंबई : घाटकोपरमध्ये रस्त्यावर झालेल्या क्षुल्लक वादातून वाहनचालकाची हत्या करून फरार झालेल्या दुचाकीस्वाराला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत अटक केली. सूरज जैस्वाल (२२) असे या आरोपीचे नाव आहे.
मृत झिशान शेख (३४) हा विक्रोळी येथे राहणारा होता. त्याचा जुन्या मोटारी खरेदी – विक्रीचा व्यवसाय होता. रविवारी दुपारी झिशान आपल्या वॅगनआर मोटारीने कुर्ला सीएसटी रोड येथे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यावरून (सर्व्हिस रोड) जात होता. त्याच मार्गवरून आरोपी सूरज जैस्वाल (२२) दुचाकीवरून मैत्रीणसह जात होता. दरम्यान, सूरज झिशानच्या मोटारीला कट मारून ओव्हरटेक करून पुढे गेला. त्यामुळे झिशान त्याला ओरडला. ते ऐकून सूरज पुढे जाऊन थांबला. कट मारून ओव्हरटेक केल्याप्रकरणी जिशानने सूरजला जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सूरजने दुचाकीच्या डीक्कीत ठेवलेला सुरा काढून झिशानवर वार केले. या हल्ल्यात झिशान गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान झिशानचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सूरज आपल्या मैत्रिणीसह दुचाकीवरून पळून गेला. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सोमवारी आरोपी सूरज जैस्वाल याला गोवंडीच्या शिवाजी नगर येथून अटक केली. घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आता त्याला अटक करण्यात आली. आरोपी सूरजला पुढील तपासासाठी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली.
…म्हणून सोबत चाकू ठेवायचा
आरोपी सूरज जैस्वाल विक्रोळी पूर्व हरियाली व्हिलेज येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबियांचा पनीरचा व्यवसाय आहे. पनीर कापण्यासाठी चाकूची आवश्यकता असते. त्यामुळे त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत चाकू ठेवला होता, असे पोलिसांनी सांगितले. सूरज रागीट स्वभावाचा आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सूरजचे घरात भांडण झाले होते. त्यानंतर तो मैत्रिणीसोबत दुचाकीवरून निघाला होता. नेमका त्याच वेळी रस्त्यात त्याचा वाहनचालक झिशानबरोबर वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने झिशानवर चाकू हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.