मुंबई : वांद्रे, खेरवाडी परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोटरगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भरधाव वेगात आलेली मोटरगाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दुचाकीवर धडकली. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मोटारगाडीचालक सिद्धेश बेळकर (२३) मित्र वनीश अरुण कुमार मौर्य, ओम महेश नागवेकर व प्रशांत हरिश्चंद्र यादव यांच्यासोबत अंधेरीहून वांद्रे येथे जेवण्यासाठी जात होते. त्यावेळे बेळेकर भरधाव वेगात मोटरगाडी चालवत होता. त्याचे मोटरगाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोटरगाडी दुभाजकाला धडकली. त्यानंतर मोटगाडी उलटली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. तेथून येणाऱ्या दुचाकीला मोटारगाडीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरून जाणारे मानव विनोद पटेल आणि हर्ष आशिष मकवाना गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बेळकर याचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे मोटरगाडी दुभाजकावर धडकली. त्यानंतर मोटरगाडीने दुचाकीला धडक दिली. अपघात झाला त्यावेळी मोटरगाडीचा वेग अधिक होता. त्यामुळे स्वतःसह मोटरगाडीतील इतर प्रवाशांचाही जीव आरोपीने धोक्यात घातला. तसेच दुचाकीस्वारांच्या मृत्यूला कारभीभूत ठरल्यामुळे त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुदैवाने मोटरगाडीतील एअरबॅग उघडल्यामुळे प्रवाशाना दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त मोटरगाडी बेळकरची आहे. याप्रकरणी बेळकरसह त्याच्या मित्रांकडून अपघाताची माहिती घेण्यात आली. तसेच घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालकाचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले असून वैद्यकीय अहवालानुसार चालक मद्यपान करून गाडी चालवत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये बेलकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. मृत पटेल व मकवाना दोघेही डिलेव्हरी बॉय म्हणून काम करायचे. ते कामावर जात असताना हा अपघातत झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.