पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत राज्यांकडून इंधनावर लादलेल्या करावरून टीका केली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकडेवारी सादर करत मोदींच्या टीकेचा प्रतिवाद केला. हा प्रतिवाद करत मोदींना उत्तर का दिलं याचं कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं कारण त्यांनी आधी अनपेक्षितरित्या महाराष्ट्राला उगाच बोल लावले. त्या बैठकीचा तो मुद्दा नव्हता, ती बैठक करोनाबाबत होती. साहजिकच मला खरी आकडेवारी देणं भाग होतं. माझ्या जनतेचा गैरसमज होता कामा नये हा माझा त्यामागचा उद्देश होता.”

“सरकार पाडण्याचा आणि छळण्याचा आटापिटा करू नका. तसं झालं तर…”

“माझी आजही अशी प्रामाणिक इच्छा आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही तीन पक्षांनी सरकार बनवलं आणि चालवलं देखील आहे. त्यामुळे हे सरकार चालू द्या. निवडणूक येणारच आहे, जनता निवडणुकीत काय करायचं ते बघेल. त्यामुळे आम्ही तीन पक्षांनी सरकार बनवलं ते योग्य की अयोग्य हे जनता ठरवेल. ती वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही हे सरकार पाडण्याचा आणि छळण्याचा आटापिटा करू नका. तसं झालं तर नाईलाजाने तुमच्या शासनामुळे पीडित झालेली सर्व राज्यं एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपाला दिला.

“तुम्ही एका पक्षाचे पंतप्रधान नाही, तर देशाचे पंतप्रधान आहात”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “खरंतर केंद्र सरकारने देशाच्या शत्रूसोबत लढलं पाहिजे. तुम्ही एका पक्षाचे पंतप्रधान नाही, तर देशाचे पंतप्रधान आहात. चीन एका बाजूने घुसलेला आहे हे नाकारता का? ते पाकिस्तानला दमदाट्या करतात, चीनला ७ वर्षात कधी दमदाटी केली का आपण? चीनला एक तरी दणका देऊ शकलो आहोत का? जसं पानावर तोंडी लावायला लोणचं असतं तसं काहीच नसलं की तुम्ही राजकारणाच्या पानावर पाकिस्तानला घेऊन बसता. मधून मधून पाकिस्तानचं चाटण चाटवलं की लोकं खूश.”

“महाराष्ट्राने केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक मला अपेक्षित होतं, पण…”

“मला दुःख याचं झालं की जगभरात जे संकट पसरलं होतं त्यात महाराष्ट्राने केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक मला अपेक्षित होतं, पण ते न करता तुम्ही त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले. चीनने १५ दिवसात रुग्णालय उभारलं तर कौतुक झालं, महाराष्ट्राने देखील मुंबईतील बीकेसी भागात १५-१८ दिवसात रुग्णालय उभारलं. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ‘फिल्ड हॉस्पिटल’ उभारली,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “करोनामुळे २ वर्षे नाटक, चित्रपट बंद, आता फुकटात करमणूक मिळत असेल तर का नको?”, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रा एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवलेलं देशात एक राज्य दाखवा”

“अख्ख्या राज्यात करोनापूर्वी सगळ्या रुग्णशय्या ७-८ हजार होत्या. त्यात सगळे आले. आज आपण चार, साडेचार लाख रुग्णशय्यांच्या आसपास पोहचलो आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवलेलं देशात मला एक राज्य दाखवा. आपली ऑक्सिजनची तयारी वाढवली आहे. या सगळ्या गोष्टी आपण युद्ध पातळीवर केल्या. आपण कोठेही आकडेवारी लपवली नाही,” असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.