वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारी यंत्रणेत पूर्वीच्या काळाप्रमाणे चातुर्वर्ण व्यवस्था राबवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच सद्यस्थितीत वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी नव्या चातुर्वर्णातील शूद्र-अतिशूद्र आहेत, असंही म्हणत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेण्याचं आश्वासन दिलं. ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पूर्वीच्या काळात असलेली चातुर्वर्ण व्यवस्था याही काळात सरकारी यंत्रणेत राबवली जात असल्याचं दिसून येत आहे. पूर्वी जसं चातुर्वर्णातील सर्वात खालच्या वर्णाला, शूद्र अतिशूद्र यांना (दलित, आदिवासी, ओबीसी) कुठलीही सामाजिक आर्थिक सुरक्षितता देण्यात येत नव्हती, त्याच पद्धतीने आता सरकार वर्ग तीन आणि वर्ग चारची पद ही कंत्राटी पद्धतीने भरून या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेत ढकलत आहे. एक प्रकारे त्यांना चातुर्ण्यातली शूद्र – अतिशूद्र यांच्या प्रमाणे हीन वागणूक देण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे.”

“सरकारने ९ खासगी कंपन्या कंत्राटी भरतीसाठी नेमल्या”

“कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इतकी वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची राजवट बघितली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाची राजवट बघितली. आता शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा यांची राजवट बघत आहेत. मात्र या धोरणात काही बदल झाल्याचे दिसून येत नाही. सध्याच्या शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने तर ९ खासगी कंपन्या कंत्राटी भरतीसाठी नेमल्या आहेत,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

व्हिडीओ पाहा :

“ग्रामसेवक भरतीतून टीसीआय कंपनीला १२० कोटी रुपयांचा फायदा”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “४ हजार ६४४ ग्रामसेवकपदाची भरती निघाली. त्यासाठी ११ लाख ५० हजार उमेदवारांनी अर्ज भरले. प्रत्येक उमेदवाराकडून टीसीआय कंपनीने १००० रुपये शुल्क घेतले. या सगळ्या व्यवहारातून टीसीआय कंपनीला १२० कोटी रुपयांचा फायदा झाला. आता या १२० कोटी रुपयांमध्ये कोणा कोणाचा किती वाटा आहे हे त्यांनी जाहीर करावे. विद्यार्थ्यांची, बेरोजगार तरुणांची ही लूट आहे. सरकारने तत्काळ ही लूट थांबवली पाहिजे.”

हेही वाचा : “शिवसेनेसोबत ‘बोलणी’ झाली, पण लग्नाची तारीख निघायची बाकी!” प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी भटजी, ते…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शासकीय व्यवस्थेतील हे चातुर्वर्ण्य मोडीत काढू”

“कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेक जण कायमस्वरुपी (‘पर्मनंट’) होण्याची वाट बघत आहेत. अनेकांची वयोमर्यादा संपली आहे, मात्र त्यांना कायमस्वरुपी नोकरीवर घेतलेले नाही. हे सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेणारही नाही. त्यामुळे आम्ही सर्व वर्गातील आणि वर्ग तीन व चारमधील कंत्राटी कामगारांना असे आवाहन करत आहोत की, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली, तर शासकीय व्यवस्थेतील हे चातुर्वर्ण्य मोडीत काढले जाईल. कंत्राटी कामगार भरती बंद करून सर्व कंत्राटी कामगारांना कायमसेवेत घेतले जाईल हा आमचा निवडणुकीचा जाहीरनामा आहे,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.