मुंबई : हिंदी आणि ओडिया चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक पद्मश्री सन्मानित साधू मेहर यांचे शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील निवासस्थानी मेहर यांनी अखेरचा श्वास घेतला.ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपट चळवळीतून ज्या कलाकारांनी लक्ष वेधून घेतले त्यांच्यापैकी साधू मेहर हे नाव आघाडीवर होते.

हेही वाचा >>> कलिना येथील एअर इंडिया वसाहतीतील १०५ पैकी केवळ १९ इमारतीच पाडण्याची योजना; मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचा उच्च न्यायालयात दावा

हिंदी चित्रपटांच्या नायकाच्या तथाकथित कुठल्याही चौकटीत न बसणाऱ्या साधू मेहर यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवातच ‘भुवन शोम’, ‘अंकुर’ आणि ‘मृगया’ यांसारख्या चित्रपटांमधून झाली.  या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. ‘अंकुर’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी साधू मेहर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. ओम पुरी, नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या ‘एनएसडी’तील उत्कृष्ट कलाकारांच्या एका फळीने हिंदी चित्रपटांमधून आपल्या सहज अभिनयाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले होती. या फळीत साधू मेहर यांचेही नाव आदराने घेतले जात असे. मेहर यांनी श्याम बेनेगल, मृणाल सेन, तपन सिन्हांसारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूळचे ओडिशातील असलेल्या मेहर यांनी हिंदी चित्रपटातील अभिनयाबरोबरच ओरिया चित्रपटात भूमिका केल्या, अभिनयाबरोबरच त्यांनी  दिग्दर्शनाची धुरा देखील उत्तम प्रकारे सांभाळली. ‘अभिमान’, ‘अभिलाषा’ तसेच ‘बबुला’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘भूखाँ’ या समीक्षकांची पसंती मिळवलेल्या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली होती. दूरदर्शनवरील ‘ब्योमकेश बक्षी’ मालिकेतील काही भागांतही त्यांनी काम केले होते. काही बंगाली चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या. २०१७ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन सन्मानित करण्यात आले.