मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) टप्पा गेल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आरे ते वरळी नाका प्रवास आता केवळ ३६ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. मात्र दुसरीकडे भुयारी मेट्रो प्रवासादरम्यान नेटवर्क नसल्याने मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून मेट्रो३ च्या संचालनावरही परिणाम होत आहे. आता मात्र प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वोडाफोनने काही दिवसांपूर्वी खंडीत केलेली मेट्रो ३ मार्गिकेवरील आपली नेटवर्क सेवा पुन्हा सुरु केली आहे. त्यामुळे वोडाफोन कार्डधारकांना आता भुयारी मेट्रो प्रवासादरम्यान नेटवर्क मिळत असून ही प्रवाशांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र त्याचवेळी जिओ आणि एअरटेल नेटवर्कच्या सेवेची अद्यापही प्रतीक्षा आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम करण्यात येत असून ३३.५ किमीच्या मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिका २०२४ मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) मार्गिका १० मे २०२५ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. मेट्रो ३ ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. त्यामुळे भुयारी मार्गिकेवरुन प्रवास करताना मोबाईल सेवा खंडीत होऊ नये, नेटवर्क मिळावे यासाठी एमएमआरसीने विशेष प्रयत्न करून आरे ते बीकेसीदरम्यान वोडाफोन आणि एअरटेलची सेवा उपलब्ध करुन दिली होती. तसेच वायफाय सुविधाही दिली होती. त्यामुळे आरे ते बीकेसीदरम्यान प्रवास करताना प्रवाशांची तितकीशी गैरसोय होत नव्हती. मात्र जिओने सुरुवातीपासूनच नेटवर्क उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्याने जिओ कार्डधारक प्रवाशांची गैरसोय होत होती. ई तिकीट खरेदी करता येत नव्हते की प्रवासादरम्यान कोणाशीही संपर्क साधता येत नव्हता. त्यामुळे जिओने नेटवर्क सेवा उपलब्ध करुन द्यावी यासाठी एमएमआरसीचा पाठपुरावा सुरु होता. पण जिओने नेटवर्क सेवा न देण्याची ठाम भूमिका घेतल्याने या कंपनीची नेटवर्क सेवा उपलब्ध झालीच नाही. अशात आता आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी नाका असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच वोडाफोन आणि एयरटेलने आपली नेटवर्क सेवा बंद केली आणि मेट्रो ३ मार्गिकेवरील संपूर्ण मोबाईल सेवाच बंद पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाईल सेवा नसल्याने ई तिकीट खरेदी येत नाही, प्रवासादरम्यान मोबाईल वापरता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. याचा परिणाम प्रवाशी संख्येवरही होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एमएमआरसीने या कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार सुरु केला आहे. पण आता मात्र एका कंपनीने अर्थात वोडाफोनने आपली नेटवर्क सेवा पुन्हा सुरु केल्याची माहिती एमएमआरसीने दिली आहे. वोडाफोनची सेवा सुरु झाल्याने वोडाफोन कार्डधारक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण जिओ आणि एयरटेल कंपनीकडून अद्यापही नेटवर्क सेवा पुरविण्यात आलेली नाही. जिओ नेटवर्क सेवा न देण्यावर ठाम आहे. नेटवर्क सेवेसाठी आकारण्यात येणारे शुल्क अधिक असल्याचे म्हणत जिओने सेवा न पुरविण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आता एमएमआरसीची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.