मुंबई: सिकलसेलल हा अनुवंषिक आजार असून आईवडिलांकडून अपत्याला होत असल्याने याबाबत वेळीच रक्ताची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. १९ जून हा सिकलसेल दिवस म्हणून साजरा केला जात असून सद्यस्थितीत राज्यात एकूण सिकलसेलचे २७ हजार रुग्ण आढळले असून व्यापक चाचणी करण्यात आल्यास दीड लाख रुग्ण आढळून येतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपली सिकलसेलची रक्त तपासणी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानेही केले आहे.

राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजी नगर, रायगड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. सन २०२३-२४ या मध्ये २६ लाख ७८ हजार लोकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली त्यात २७,१७२ रुग्ण आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाने २०२३ ते २५ या कालावधीसाठी सिकलसेल तपासणीचे जे उद्दिष्ट निश्चित केले होते त्यापैकी ४० टक्के उद्दिष्ट साध्य करणे अद्यापि बाकी असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल आजारविषयी नागरिकांमध्ये जनजागृती, रुग्णांना मोफत औषधे आणि त्यांचे समुपदेशन केले जाते. याशिवाय, मोफत सोल्युबिलीटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस केंद्रावर मोफत इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी, सिकलसेल रुग्ण व्यक्तींसाठी नियमित आरोग्य तपासणी, रुग्णांना गरजेनुसार फॉलीक अॅसिडच्या गोळ्या, अॅन्टीबायोटीक्स (प्रतिजैविके), वेदनानाशक औषधांचा पुरवठा, आवश्यकतेनुसार रक्त चाचण्यांची सुविधा, रक्तपेढी असल्यास सिकलसेल रुग्णांना रक्तसंक्रमण सुविधा, एचपीएलसी चाचणी केंद्रामध्ये मोफत चाचणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी टेलिमेडिसीन आदी सुविधा आरोग्य विभागाच्या मार्फत पुरविल्या जातात.

सिकलसेल आजार हा आनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात; तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्त वाहिन्यांतून सरळ निघून जातात. परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला सिकलसेल क्रायसिस म्हणतात. यामुळे असहा वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होती.प्लीहा मध्ये नष्ट झालेल्या रक्तपेशी जमा होतात, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी अडकल्यामुळे प्लीहेवर जबरदस्त सूज येते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आजारा विरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आजाराचे प्रमाण अधिक वाढते.

सिकलसेल आजाराचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे ‘वाहक’ (एएस) तर दुसरा प्रकार म्हणजे ‘रुग्ण’ (एसएस). या साजाराला प्रतिबंध करायचा असेल तर वाहक-रुग्ण, वाहक-वाहक, रुग्ण-रुग्ण यांनी आपआपसात विवाह करुन नये, कारण अशा विवाहामुळे होणारे अपत्य हे सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होऊ शकते. परंतु सिकलसेलग्रस्त रुग्ण किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास अपत्यांना सिकलसेल आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्यामुळे माता-पित्याकडून अपत्यांना हा आजार होतो परिणामी विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करुनच विवाह करावा, लाल (एसएस) आणि पिवळे (एएस) कार्ड असलेल्यांनी आपआपसात विवाह टाळावा,सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा,सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.

या आजारा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे,सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे आदी लक्षणे दिसतात. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून या आजाराचा संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण करणे शक्य आहे. सिकलसेल रुग्णांना नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. सिकलसेल रुग्णाचे योग्य औषधोपचाराने आयुष्य वाढते. सिकलसेलग्रस्त रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणीची आवश्यकता असते, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या निदमित घेणे, सोडामिंटच्या गोळ्यांचे सेवन महतत्वाचे असते. भरपूर पाणी पिणे (दररोज ८ ते १० ग्लास), वेदनाशामक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे. गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे. समतोल आहार : सिकलसेल रुग्णांनी आहारात विविधता ठेवावी. दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा. मासे, अंडी, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, शेंगा, झिंक असलेले पदार्थ खाणे- बोनमरो ट्रान्सप्लांटेशन करून हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो.
सिकलसेलग्रस्त रुग्णांना (एसएस पॅटर्न) संजय गांधी निराधार योजने अंतर्गत शासनाचा आर्थिक लाभ मिळतो.

महत्त्वाचे म्हणजे, सिकल सेल आजार आता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१७ अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे या आजाराने बाधित झालेल्या व्यक्तींना, विशेषतः मुलांना, शैक्षणिक आरक्षण व सामाजिक मदत मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र कायद्यातील अलीकडील सुधारणा सिकल सेल रुग्णांना प्रमाणपत्र मिळवणे सोपे बनवतात, ज्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा व सवलतींचा लाभ घेणे शक्य होते. १० वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला २० मिनिटे अधिक अवधी दिला जातो. सिकलसेल रुग्णांना उपचाराकरिता बस प्रवासात सवलत दिली जाते.

थॅलेसेमिया व सिकल सेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व विख्यात बालरोजतज्ज्ञ डॉ. विन्की रुघवाणी यांच्या म्हणण्यानुसार देशात सिकलसेलचे १४ लाख रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात दीड लाख रुग्ण आहेत. या आजाराची गंभीरता पाहता केंद्र सरकारने “सिकल सेल मुक्त भारत” ही मोहीम सुरू करून योग्य पाऊल उचलले आहे. मात्र राज्यातील प्रत्येक तरुणाची या आजाराची चाचणी होणे आवश्यक आहे तसेच विद्यापीठांमध्ये पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सिकल सेल तपासणी अनिवार्य करावी. या टप्प्यावर लवकर तपासणी केल्यास वाहक ओळखता येतील आणि प्रतिबंधात्मक उपायांनी आजाराचा प्रसार थांबवता येईल असे डॉ रुघवाणी यांनी सांगितले.

प्रतिबंधाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, थॅलेसेमिया व सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया आणि संकल्प इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत, सर्व गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीत एचपीसीएल चाचणीद्वारे तपासणी केली जाते. जर महिला थॅलेसेमिया मायनर किंवा सिकल सेल ट्रेटची वाहक आढळली, तर तिच्या पतीचीही तपासणी केली जाते. जर दोघेही वाहक असतील, तर गर्भधारणेच्या १२व्या आठवड्यात कोरीऑनिक व्हिलस सॅम्पलिंग चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. ही अत्यंत महत्त्वाची चाचणी थॅलेसेमिया मेजर किंवा सिकल सेल आजारग्रस्त बालकाचा जन्म होण्यापासून प्रतिबंध करते. डॉ. रुघवाणी यांनी सांगितले की, हा प्रकल्प विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्यात येत आहे. या टप्प्यामुळे आनुवंशिक रक्तविकार असलेल्या मुलांचा जन्म दर कमी करण्यात मोठा फरक पडेल अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिकल सेल आजाराचे एकमेव कायमस्वरूपी उपचार म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट असला तरी, तो खूप खर्चिक (१४-१५ लाख) आणि धोकादायक आहे, तसेच योग्य दाता मिळवणे कठीण असते. म्हणूनच उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर दिला पाहिजे. डॉ. रुघवाणी यांनी सांगितले की, हा आजार पूर्णतः टाळता येण्यासारखा आहे. सिकल सेल रोगग्रस्त मूल केवळ तेव्हाच जन्मते जेव्हा दोघेही पालक वाहक असतात. सिकल सेल ट्रेट असलेल्या व्यक्ती सामान्य आयुष्य जगतात व त्यांना आपली स्थिती माहीतही नसते. मात्र, दोन वाहकांनी विवाह केल्यास त्यांच्या मुलाला आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मुला-मुलीने विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. ही एक साधी तपासणी आजीवन वेदनादायक आयुष्य टाळू शकते आणि पुढच्या पिढ्यांना या आजारापासून वाचवू शकते.