मुंबई : राज्यभरात बाईक टॅक्सी सेवांचे नियमन आणि सुव्यवस्थितीकरण करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार, प्रवासी आणि चालक दोघांचीही सुरक्षितता, सुविधा व हक्क सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यानुसार ‘बाईक टॅक्सी’ला चिन्हांकित करणारे पिवळ्या रंगाचे वाहन अनिवार्य असेल. तसेच, १२ वर्षांखालील मुलांना बाईक टॅक्सीवरून नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने बाईक-टॅक्सी चालकांना प्रत्येक प्रवासासाठी स्वच्छ आणि पिवळ्या रंगाचे हेल्मेट प्रदान करणे अनिवार्य केले आहे. याव्यतिरिक्त, दुचाकीस्वार आणि चालक यांच्यामध्ये विभाजक असावे, पावसाळ्यात संरक्षक कवच आणि जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच, मुसळधार पाऊस किंवा वादळासारख्या यासारख्या परिस्थितीच्या वेळी बाईक टॅक्सी सेवा रद्द केल्या पाहिजेत. नवीन धोरण चौकटीत बाईक-टॅक्सी एकत्रित करणाऱ्यांसाठी कठोर अटी निश्चित केल्या आहेत. त्यात प्रवासी पात्रता, सुरक्षा मानांकन, भाडे नियम आणि उल्लंघनांसाठी जबाबदारी याबद्दलचे नियम समाविष्ट आहेत. यामध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घेऊन प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक फेरीमध्ये फक्त एकाच प्रवाशाला मागे बसण्यास परवानगी असेल.
महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय देणे, महिला चालकांची संपर्क माहिती प्रसारित करण्यास मनाई करणे आणि महिलांच्या रोजगाराला प्रोत्साहन देणे यांचाही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त, सर्व चालकांसाठी नियमित सुरक्षा प्रशिक्षण आणि वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असेल. बाईक टॅक्सीचे प्रवास अंतर १५ किमीपेक्षा जास्त नसावे, वेग ताशी ६० किमी मर्यादित असावा. प्रवास सुरू करण्यापूर्वी अॅप किंवा इतर माध्यमांद्वारे भाडे स्पष्टपणे कळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ते प्रादेशिक किंवा राज्य वाहतूक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असू नये. अपघाती मृत्यू झाल्यास चालक आणि प्रवाशासाठी किमान दोन लाख रुपयांचा विमा संरक्षण सुनिश्चित करावे लागेल.
आणखी काय अनिवार्य ? वाहतूक विभागाला बाईक-टॅक्सींचे रिअल-टाइम जीपीएस मॉनिटरिंग देखील आवश्यक आहे. ज्यामध्ये आवश्यकतेनुसार कायदा अंमलबजावणी संस्थांना डेटा उपलब्ध करून दिला जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मदतवाहिनी आणि पॅनिक बटणांसह आपत्कालीन वैशिष्ट्ये देखील ऑपरेटर अॅप्समध्ये समाविष्ट करण्याची अट घातली आहे. पाहिजे. बाईक-टॅक्सी सेवा चालवण्याचा विचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, भागीदारी कंपनी किंवा कंपनीला राज्य किंवा प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांकडून परवाना घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात नोंदणीकृत किमान ५० बाईक-टॅक्सींचा ताफा असलेल्यांनाच परवाना दिला जाईल. अर्जदारांना एक लाख रुपयांचे परवाना शुल्क आणि पाच लाख रुपयांची सुरक्षा ठेव यासह सविस्तर अर्ज सादर करावा लागेल. अर्जात निगमन कागदपत्रे, जीएसटी आणि पॅन नोंदणी आणि ऑपरेशनल पायाभूत सुविधांचा पुरावा समाविष्ट असावा. परवाना पाच वर्षांसाठी वैध राहील. परवानाधारकांनी प्रत्येक वाहनासाठी योग्य देखभाल, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र सुनिश्चित केले पाहिजे. सेवा कंत्राटी वाहने म्हणून चालवल्या पाहिजेत आणि प्रादेशिक परवाना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
५ जूनपर्यंत सूचना-हरकती पाठवता येणार
दरम्यान, २२ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेत ५ जून २०२५ पर्यंत नागरिकांकडून ना-हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करता येतील.