मुंबई : गेल्या तीन वर्षांत युट्यूबवरून प्रसारीत होणाऱ्या भारतीय ‘कंटेट’चा मोबदला म्हणून त्यांच्या निर्मात्या, कलाकारांना २१ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगत ‘भारत हे सर्जनशील राष्ट्र आहे’ असे गौरवोद्गार यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नील मोहन यांनी गुरुवारी ‘वेव्ह्ज’ परिषदेतील एका परिसंवादात म्हटले.

वांद्रे कुर्ला संकुलातील ‘जिओ’ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेनमेन्ट समिट’ (वेव्ह्ज) सोहळ्यातील एका परिसंवादात नील मोहन हे सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी भारतीय कलावंत, सर्जक (क्रिएटर) आणि माध्यम कंपन्यांना बळकटी देण्यासाठी येत्या दोन वर्षांत यूट्यूब भारतात ८५० कोटींची गुंतवणूक करेल, अशी घोषणा केली.

जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत भारतीय इतिहास, संस्कृती आणि आवडीनिवडी पोहोचवण्याचे भारतीयांचे कौशल्य वाखाणण्याजोगे असल्याचे सांगताना मोहन म्हणाले,‘गतवर्षी भारतातून निर्माण झालेला ‘कंटेट’ परदेशांत ४५ अब्ज तास पाहण्यात आला.

गेल्या तीन वर्षांत भारतीय सर्जक आणि कलाकारांना युट्यूबने मोबदला म्हणून २१ हजार कोटी रुपये दिले आहेत.’ गेल्या वर्षभरात भारतातील दहा कोटी युट्यूब वाहिन्यांवरून कंटेट प्रसारित करण्यात आला. त्यापैकी १५ हजार वाहिन्यांना दहा लाखांहून अधिक सभासद आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. भारतात सर्जनशीलतेची ज्योत पेटवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा मोठा वाटा असून त्यांची वैयक्तिक अडीच कोटी सभासदसंख्या जगातील कोणत्याही सत्ताप्रमुखापेक्षा अधिक असल्याचे मोहन म्हणाले. जगात कोणत्याही कोपरात असलेल्या सर्जकाला जगातील प्रत्येक कोपऱ्यातील प्रेक्षक मिळवून देण्याचे काम यूट्यूबने केले असून सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या या शक्तिशाली इंजिनाचा वापर करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असे प्रशंसोद्गारही त्यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दशकभरात भारतीय मनोरंजन उद्याोग १०० अब्ज डॉलरपार भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योग येत्या दहा वर्षांत १०० अब्ज डॉलरच्या पलिकडे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करतानाच, या प्रगतीतून हजारो उद्योजक, लक्षावधी नोकऱ्या आणि अन्य उद्याोगक्षेत्रांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल, असा आशावाद रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी या परिषदेत व्यक्त केला. पहलगाममधील हल्ल्यानंतरच्या कठीण परिस्थितीतही पंतप्रधान मोदी यांची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती हे शांती, न्याय आणि मानवतेच्या शत्रूंना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे, असेही अंबानी म्हणाले.