करोनामुळे नियमित रेल्वेगाड्या बंद करून विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. परंतु, या विशेष गाड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, कर्करुग्ण, अपंग यांना प्रवासभाड्यात मिळणारी सवलत संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

भारतीय रेल्वेने टाळेबंदी लागल्यापासून म्हणजे २४ मार्च २०२० पासून प्रवासी रेल्वेगाड्या बंद केल्या. त्यानंतर हळूहळू विशेष गाड्या, श्रमिक गाड्या आणि करोना विशेष गाड्या सुरू केल्या. आता प्रत्येक मार्गावर विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. नियमित गाड्यांच्या वेळेवर आणि मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र, विशेष गाड्या असल्याने कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जात नाहीत. याचा सर्वाधिक फटका कर्करुग्णांना बसत आहे. विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह््यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशातील रुग्ण नागपुरात उपचारासाठी येतात. नागपूर-अमरावती-जबलपूर या गाडीत तर बहुतांश प्रवासी कर्करोग आणि इतर आजारावर उपचार करण्यासाठीच येणारे असतात. त्यांचे उत्पन्न अतिशय कमी असते. कर्करुग्णाला विशिष्ट कालावधीत किमोथेरपी देणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांना  प्रवास टाळता येत नाही. रेल्वेत सवलत मिळत नसल्याने या रुग्णांचे हाल होत आहेत.

यासंदर्भात रेल्वेच्या डीआरयूसीसीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोविड-१९ विशेष गाड्यांचे प्रवासभाडे नियमित रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक आहे. प्रत्येक प्रवाशाला विशेष गाडीचे अतिरिक्त प्रवासभाडे देणे परवडत नाही. रेल्वे बोर्डाला पत्र लिहून नियमित गाड्या सुरू करण्याची विनंती करावी. तसेच ज्येष्ठ नागरिक, कर्करुग्ण, अपंग आणि इतर सवलतधारकांना रेल्वे प्रवासात सवलत सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याशिवाय नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या स्वच्छ नसतात. योग्यप्रकारे निजर्तुंकीकरण  केले जात नाही. प्रवासी आणि हमाल देखील शारीरिक अंतराचे नियम पाळत नाहीत. टीटीई, कंडक्टर आणि इतर अधिकारी मुखपट्टी वापरत नाहीत. तिकीट तपासणीला देखील केली जात नाही. यात सुधारणा करण्याची मागणी मध्य रेल्वे डीआरयूसीसीचे सदस्य राहुल शुक्ला यांनी केली.

 

रेल्वेने काही गाड्यांमध्ये सवलत दिली आहे. गेल्या तीन दिवसात सात अपंग आणि सहा कर्करुग्णांनी सवलतीच्या दरात तिकीट खरेदी केले आहेत.

– एस.जी. राव,  सहायक वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे.