रागाच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नाही. त्यातही मद्यपान केलेलं असेल, तर मग अंदाज न लावलेलाच बरा. नागपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. मद्यपान केलेल्या दोघांनी थेट ढाबाच पेटवून दिला. ढाबा मालकाने चिकनची भाजी बनवून देण्यास नकार दिला म्हणून दोघांना राग अनावर झाला.

शंकर तायडे (वय २९) आणि सागर पटेल (वय १९) असं ढाबा पेटवून देणाऱ्या आरोपींची नावं आहेत. दोघेही रविवारी मद्यपान केल्यानंतर बेलतरोडी भागात गेले होते. दोघेही एका ढाब्यावर गेले. त्यांनी मालकांकडे चिकनच्या भाजीची ऑर्डर दिली. मात्र, ढाबा मालकानं चिकनची भाजी बनवून देणं शक्य नसल्याचं सांगितलं.

त्यानंतर दोघांनी रागाच्या भरात ढाबाच पेटवून दिला. रविवारी ही घटना घडली. सुदैवानं या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.