जादा पैसे घेतले जात असल्याचा आरोप नागपूर : करोनामुळे खाजगी रुग्णालयात उपचार महागले असून जसजशी मृत्यूसंख्या वाढत आहे तसतसे अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. करोनाग्रस्तांच्या वाढत्या मृत्युमुळे शहरातील अनेक दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्काराचे साहित्य विक्रेत्यांनीही साहित्याच्या दरात वाढ केली आहे. सहकारनगर घाटाला लागून रस्त्यावर अंत्यविधी साहित्याच्या दुकानात दुप्पट भावाने साहित्य विकत आहेत. याशिवाय मोक्षधाम, गंगाबाई घाट, वैशालीनगर, पारडी, मानेवाडा घाट परिसरात अंत्यसंस्काराच्या सामानाची दुकाने थाटली आहेत. एरवी अंत्यविधी साहित्यासाठी २ ते ३ हजार रुपये मोजावे लागतात. आता मात्र ५ त ६ हजार रुपये द्यावे लागत आहे. स्मशानभूमीवर अंत्यसंस्काराचे लाकूड, गोवऱ्यांचे पैसे वेगळेच आकारले जातात. तेथील कर्मचारी अंत्यविधीची सर्व तयारी करण्याचेही मृताच्या नातेवाईकांकडून वेगळे पैसे घेतात. पूर्वी चार बांबू, काडय़ा, मडके, साडी किंवा धोतर आणि इतर चिल्लर साहित्य १५०० ते २ हजार रुपयाला मिळायचे ते तीन त साडेतीन हजाराला रुपयाला मिळत आहे. याशिवाय हार फुलं, तूप, कापूर, राळ यांचे पैसे वेगळे घेतात. त्यामुळे पाच ते सहा हजार रुपयाला अंत्यविधीच्या साहित्याची विक्री केली जात असून यावर महापालिकेच्या संबंधित विभागाचे नियंत्रण नाही. अंत्यविधीसाठी येणारे मृताचे नातेवाईक वेगळ्या मानसिकतेमध्ये असल्यामुळे ते दुकानदाराशी वाद न घालता पैसे देऊन मोकळे होतात. त्याचाच फायदा सध्या दहनघाटाजवळील दुकानदार व घाटावरील काही कर्मचारी घेत आहे. घाटावर सरण रचण्याची जबाबदारी घाटावरील कर्मचाऱ्याची आहे, मात्र सरण रचण्यासह अंत्यसंस्काराची जागा मिळवून देण्याचे व स्वच्छ करण्याचे वेगळे पैसे घेतात. करोनामुळे आधीच खाजगी रुग्णालयात लाखो रुपयांची देयके दिली जात असताना दहनघाटावर व अंत्यविक्रीसाठी साहित्यासाठी जास्तीचे पैसे घेतले जात आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची दुप्पट भावाने विक्री करून लोकांची लुबाडणूक केली जात असेल किंवा स्मशान घाटावरील कर्मचारी जास्तीचे पैसे मागत असतील तर त्यांची व दुकानदारांची चौकशी केली जाईल. या संदर्भात अजूनही कुठल्या तक्रारी आल्या नाहीत. पण माहिती घ्यावी लागेल. - प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका