रुग्णालयांत जागा नसल्याने मात्र मृत्यू वाढण्याचा धोका

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : जिल्ह्य़ात मागच्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण व मृत्यूंची नोंद झाली होती. आता २०२१ मध्येही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये  करोनाची दुसरी लाट आधीपेक्षा गंभीर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या अधिक असली तरी मृत्यूदर मात्र कमी आहे. परंतु आता रुग्णालयांत गंभीर रुग्णांना खाटा मिळत नसल्याने मात्र मृत्यूदर वाढण्याचा धोका आहे.

उपराजधानीत ११ मार्च २०२० ला पहिला करोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर २७ मार्च २०२१ पर्यंत शहरात १ लाख ६९ हजार ८१०, ग्रामीण ४४ हजार १८, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २२ असे एकूण २ लाख १४ हजार ८५० रुग्ण आढळले. त्यातील १ लाख ७२ हजार ६३४ व्यक्ती करोनामुक्त झाले. शहरात ३,११६, ग्रामीण ९१७, जिल्ह्य़ाबाहेरील ८४० असे एकूण ४,८७३ मृत्यू झाले. हे मृत्यूचे प्रमाण शहरात १.८३ टक्के, ग्रामीण २.०८, जिल्ह्य़ाबाहेरील ८२ टक्के असे जिल्ह्य़ात एकूण २.२६ टक्के होते. ऑगस्ट- २० मध्ये शहरात १९

हजार ७२, ग्रामीण ५,०७१, जिल्ह्य़ाबाहेरील २० असे एकूण २४ हजार १६३ रुग्ण आढळले.

या महिन्यात शहरात ७१८, ग्रामीण १२९, जिल्ह्य़ाबाहेर २० असे एकूण ९१५ मृत्यू झाले. हे मृत्यूचे प्रमाण शहरात ३.७६ टक्के, ग्रामीणला २.५४ टक्के होते. सप्टेंबर- २० मध्ये शहरात ३९ हजार १०८, ग्रामीण ९,२०२, जिल्ह्य़ाबाहेरील १४७ असे एकूण ४८ हजार ४५७ रुग्ण आढळले.

यापैकी शहरात १,०३१, ग्रामीण २८७, जिल्ह्य़ाबाहेर १४७ मृत्यू झाले. हे मृत्यूचे प्रमाण शहरात २.६३ टक्के, ग्रामीण ३.११ टक्के होते. ऑक्टोबर- २० मध्ये जिल्ह्य़ात १२ हजार २८९ रुग्ण आढळले  तर ४१५ मृत्यू झाले. मृत्यूचे हे प्रमाण ३.३७ टक्के होते.

यंदा २०२१ मध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात नागपुरात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी- २१ मध्ये शहरात १२ हजार ८६७, ग्रामीण २,५८१, जिल्ह्य़ाबाहेरील ६६ असे एकूण १५ हजार ५१४ रुग्ण आढळले.  शहरात २,७२२, ग्रामीण ७४१, जिल्ह्य़ाबाहेरील ६९५ असे एकूण ४,१५८ मृत्यू झाले. मृत्यूचे प्रमाण शहरात ०.६२ टक्के, ग्रामीण १.२० टक्के होते. १ ते २७ मार्च २१ मध्ये शहरात ५० हजार ३१६, ग्रामीण १४ हजार ६६७, जिल्ह्य़ाबाहेरील ७९ असे एकूण ६५ हजार ६२ रुग्ण आढळले. शहरात ३१४, ग्रामीण १४५, जिल्ह्य़ाबाहेरील ७९ असे एकूण ५३८ मृत्यू झाले. हे मृत्यूचे प्रमाण शहरात ०.६२ टक्के, ग्रामीण ०.९८ टक्के आहे.

रुग्णालयांचीच स्थिती ‘नाजूक’

नागपुरात मेडिकल, मेयो, एम्स या तीन शासकीय टर्शरी दर्जाच्या रुग्णालयांत करोना रुग्णांवर उपचाराची सोय आहे. परंतु तिन्ही रुग्णालयांत सध्या गंभीर रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. त्यामुळे काही रुग्णांना प्रवेशासाठी तब्बल १ ते २ दिवस थांबावे लागत आहे. नावाजलेल्या खासगी रुग्णालयांत जागा नसल्याने रुग्ण दाखल्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यामुळे  ऑक्सिजनचे प्रमाण ७० ते ८० वर आलेले  गंभीर करोनाग्रस्त वाढत आहेत. दरम्यान, मेडिकल, मेयो रुग्णालयात गेल्या २५ दिवसांत दगावलेल्या अवस्थेत ४५ तर दाखल झाल्यावर २४ तासांच्या आत ९५ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.