शेतकरी विषबाधेवरून पटोले यांची टीका

यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धेला येतात. पण शेजारी यवतमाळ जिल्ह्य़ात जात नाही हे या राज्याचे दुर्देव आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यावर केली.

नागपुरात शेतकरी आंदोलनासाठी पटोले आज आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यवतमाळमधील घटना वर्तमानपत्रातून कळल्यावर तेथे जाऊन आलो. शेतक ऱ्यांशी संवाद साधला. चिनी कंपनीच्या कीटकनाशकामुळे शेतक ऱ्यांना विषबाधा झाली. मात्र सरकारने त्याची हवी तशी दखल घेतली नाही. मंत्र्यांनी भेट देऊन हा प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तेथे भेट देणे आवश्यक होते. मात्र ते वर्धेला ‘ड्राय पोर्ट’च्या कार्यक्रमाला गेले. पण शेजारी यवतमाळ जिल्ह्य़ात गेले नाही. त्यांच्या जाण्याने परिस्थिती काही अंशी तरी बदलली असती. ते राज्याचे गृहमंत्री आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ संबंधित कंपनीच्या चौकशीचे आदेश देऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली असती, त्याचवेळी यंत्रणा कामाला लागली असती. मात्र सरकार असवंदेशनील असल्याचे दिसून आले.मुख्यमंत्री माझे मित्र आहे. त्यांनी तात्काळ यवतमाळचा दौरा करावा आणि या प्रकरणाची चौकशीचे आदेश द्यावे, असा सल्लाही पटोले यांनी दिला.

यवतमाळला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीला गेलो आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच दिवशी पंतप्रधानांना पत्र लिहिले. त्यांनी याची दखल घेतली. आज केंद्रीय चमू यवतमाळ जिल्ह्य़ात पोहोचली आहे. हे काम मुख्यमंत्री करु शकले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी केंद्राला कळविले की नाही याबाबत शंका आहे.  केंद्र सरकारने चीनहून येणाऱ्या कीटकनाशके भारतात येणे थांबवले तर अशा घटनापासून शेतकऱ्यांना वाचवता येईल,असे पटोले म्हणाले.

तिवारींकडून अपेक्षाभंग

किशोर तिवारी स्वतला शेतकरी नेते म्हणवतात. त्यांनी सरकार चुकत असेल तर ते त्यांनी पुढे आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मात्र पूर्वी शेतक ऱ्यांसाठी झगडणारा आणि लढणारे तिवारी आता मात्र सरकारची बाजू घेत आहेत, त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही.

मानवाधिकार आयोगाची केंद्र, राज्याला नोटीस

नागपूर : विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधित होऊन शेतकरी दगावण्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून दखल घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सोमवारी नोटीस बजावली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील गेल्या तीन महिन्यात विषबाधेमुळे २२ मृत्यू झाले आहेत. यासंदर्भातील वृत्त विविध वर्तमानपत्रात आले. त्याची दखल घेत मानाधिकार आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय कृषी खात्याच्या सचिवांना नोटीस पाठवून या प्रकरणाची सविस्त माहिती चार आठवडय़ात सादर करण्याचे निर्देश दिले आहे. बाधित शेतकऱ्यांना योग्य उपचार सुविधा पुरवण्यासह अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी व दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.