अनेक ठिकाणी नुसतेच कोरडे रांजण नागपूर : उन्हाळ्यात लोकांची तहान भागवण्यासाठी शहरात अनेक सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी पाणपोई सुरू केली. पण, यंदा पाणपोईसाठीसुद्धा पाणी मिळणे कठीण झाल्याने काही ठिकाणच्या पाणपोई बंद करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी नुसतेच कोरडे माठ, रांजण नजरेस पडत आहेत. हे कोरडे रांजण शहरातील पाणीटंचाईची तीव्रता यातून स्पष्ट होते. बाटलीबंद पाण्याची विक्री होऊ लागली तेव्हापासून पाणपोईंची संख्या कमी झाली असली तरी गोरगरिबांसाठी आजही पाणपोईच मोठा आधार ठरत आहेत. यंदा शहरात एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक नागरी वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सार्वजनिक विहिरीही आटल्या आहेत. त्यामुळे पाणपोईसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी पाणपोई त्या ठिकाणी सार्वजानिक नळ किंवा बोअरवेल आहेत मात्र, नळाला पाणी येण्याचा कालावधी एक किंवा दोन तास असल्यामुळे परिसरातील नागरिकच गर्दी करतात. त्यामुळे पाणपोईसाठी पाणी मिळत नाही. परिणामी, अनेक संस्थांनी स्वंयस्फूर्तीने सुरू केलेला हा विधायक उपक्रम मध्येच थांबवला आहे. अनेक ठिकाणी तर जेवढे पाणी उपलब्ध आहे त्यावेळेतच त्याचे वाटप केले जाते नंतर बंद केले जाते. कठोर नियमांचाही फटका पूर्वी पाणपोई सुरू करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नव्हती. मात्र, आता अशा उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी सक्तीची झाली आहे. या सामाजिक उपक्रमासाठी महापालिकेकडून सार्वजनिक जागा वापरण्याची मुभा दिली जायची. मात्र, कुठेही जागा घेऊन अतिक्रमणांची संख्या वाढल्याने महापालिकेने या बाबतीत नियम कडक केले आहेत. आधी रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांसाठी विविध भागात पाण्याचे टाके तयार केले जात होते. मात्र, अशा टाक्याची संख्याही कमी झाली आहे. टाकी आहे तर पाणी नाही, असे चित्र शहरात दिसत आहे.