पैसे परत करण्याची घोषणा हवेत; वित्त विभागाला आदेशच नाही नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने फेरमूल्यांकन शुल्काच्या नावावर तीन वर्षांत ३ कोटी ३० लाखांची गंगाजळी जमवल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी २०१६ मध्ये फेरमूल्यांकनाचा निकालात बदल झाल्यास विद्यार्थ्यांना शुल्क परत केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, फेरमूल्यांकनात बदल झाल्यास विद्यार्थ्यांची रक्कम परत करण्याबाबत वित्त विभागाला तीन वर्षांपासून कुठलेही निर्देशच प्राप्त नसल्याचे समोर आल्याने विद्यापीठाचे पीतळ उघडे पडले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विद्यापीठाच्या फेरमूल्यांकनासाठी आलेले अर्ज आणि उत्पन्नाची माहिती मागितली असता हे वास्तव समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनामध्ये अनेक दोष असल्याने विद्यार्थ्यांच्या निकालात अनेक चुका होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना फेरमूल्यांकनाची ही सुविधा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांला एका उत्तरपत्रिकेसाठी १६० तर दोन उत्तरपत्रिकेसाठी ३२० रुपये शुल्काची आकारणी केली जाते. फेरमूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज येत असून दरवर्षी त्यात वाढ होते आहे. यातून विद्यापीठाने मोठी गंगाजळी जमवली आहे. मूल्यांकनामध्ये होणाऱ्या चुकांमध्ये विद्यार्थ्यांची कुठलीही चूक नसताना त्यांना नाहक आर्थिक भरुदड बसत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष होता. त्यामुळे फेरमूल्यांकनाच्या निकालात बदल झाल्यास विद्यार्थ्यांना पैसे परत करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. यावर कुलगुरू डॉ. काणे यांनी २०१६ मध्ये निकालात बदल झाल्यास पैसे परत करण्याची घोषणा विधिसभेमध्येही केली होती. मात्र, वित्त विभागाला तीन वर्षांनंतरही पैसे परत करण्याचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आल्याने कुलगुरूंच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जात आहे. विद्यापीठाकडे २०१६ मध्ये ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, तर २०१९ मध्येही संख्या ४५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले. यातून २०१६ मध्ये विद्यापीठाकडे ४७ लाख ६६ हजार, २०१७ मध्ये १ कोटी १५ लाख तर २०१९ मध्ये १ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठाने तीन वर्षांत ३ कोटी ३० लाखांचा निधी जमा केला आहे. मात्र, वित्त विभागाला पैसे परत करण्याच्या सूचना नसल्याने एकाही विद्यार्थ्यांना परतावा मिळालेला नाही. परंतु विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भरवशावर कोटय़वधींचा निधी गोळा केला हे मात्र विशेष. विद्यापीठाला प्राप्त निधी २०१६-१७ - ४७ लाख ६६ हजार २०१७-१८- १ कोटी १५ लाख २०१८-१९- १ कोटी ६६ लाख फेरमूल्यांकनासाठी आलेले अर्ज उन्हाळी २०१६ - ११,११६ हिवाळी २०१६ - २०,८८५ उन्हाळी २०१७- २३,७७४ हिवाळी २०१७- २९,५४४ उन्हाळी २०१८-३८,९९६ हिवाळी २०१८- ४५,१५९