लोकसत्ता टीम चंद्रपूर: उन्हाळ्यात चंद्रपूरकर भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. शहरात १२ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अशातच वॉल लीक झाल्याने १२ लाख लिटर पिण्याचे पाणी वाहून गेले. पाण्याच्या टाकीच्या आवारात, रस्तावर सर्वत्र पाणीच पाणी होते. शहरातील प्रियदर्शनी चौक संकुलात असलेल्या पाण्याच्या टाकीच्या गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळ पासून रात्री दहा वाजेपर्यंत पाण्याच्या टाकीच्या आवारातील रस्त्यावर पाणी साचलेले दिसून येत होते. महापालिकेच्या पथकाकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार १२ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या वॉलला गळती लागली आहे. त्यामुळे दुपारपासून पाणी वाहू लागले. योग्य देखभालीअभावी अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बुधवारी काही भागात पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वॉल लीक झाला आहे. रात्रीपर्यंत त्याची दुरुस्ती केली जाईल. पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. आणखी वाचा-बुलढाणा : ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; महिला ठार, २० प्रवासी जखमी मात्र १२ लाख लिटर पिण्याचे पाणी वाहून गेल्याने महापालिकेच्या अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या बेजबाबदार पणा यातून दिसून आला. पाण्याची टाकी ज्या प्रभागात येते त्या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात उन्हाळ्यात एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अमृत योजनेच्या नळाला अजून एक थेंब पाणी आलेले नाही. ३०० कोटीची अमृत योजना पूर्णपणे फसलेली आहे. हे महापालिकेतील सत्ताधारी भाजप व अधिकारी यांचे अपयश आहे. अमृत पाणी पुरवठा योजना चा ठेकेदार पूर्ण बिल उचलून काम अपूर्ण ठेवून पळून गेला आहे. त्यातच पाण्याच्या टाकीचे वॉल दुरुस्ती व देखभाल याचेही काम एका माजी नगरसेवक याचे मुलाचे कंपनी कडे आहे. असे १२ लाख लिटर पाणी वाहून जात असेल तर नागरिकांनी पाण्यासाठी कुठे जायचे असा सवालही वैद्य यांनी केला आहे.