पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धूम सुरू असताना जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतमध्ये राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ पैकी तब्बल ८ सदस्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर विश्वास दर्शवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांनी काँग्रेसच्या हात सोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेची ढाल तलवार हाती घेतली.

हेही वाचा >>>नागपूर:पसंतीक्रमानुसार मतदानाला लागतो वेळ, केंद्रापुढे शिक्षकांच्या रांगा

नगरपंचायतच्या निवडणुकीला १ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असताना ठप्प असलेली विकास कामे आणि न मिळणारा विकास निधी यामुळे सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. यामध्ये मोताळा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा शेहनाजबी शेख सलीम, गट नेत्या पुष्पा चंपालाल जैन, शेख तस्लिम शेख सलीम बाबा, खातूनबी शेख रशीद, शीला कैलास खर्चे, सरिता विजय सुरडकर, परवीनबी शेख आसिफ यांचा समावेश आहे. यावेळी शेख सलीम चुनवाले, जलील खासाहब, शेख आसिफ, विजय सुरडकर यांनीही आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा >>>नागपूर: मेळघाटात दुर्मिळ रानपिंगळ्याचे दर्शन; आठ नवीन प्रजातीची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमारे एक वर्षापूर्वी झालेल्या मोताळा नगरपंचायतच्या निवडणुकीत १८ पैकी १२ जागा मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. दिवंगत काँग्रेस नेते नाना देशमुख यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष माधुरी देशमुख पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. या घाऊक पक्षांतरची बीजे तेव्हाच रोवली गेली. प्रवेश सोहळा झाल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रवेश केलेल्या सदस्यांना शुभेच्छा देऊन नगरविकास खात्यामार्फत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.