नागपूर : बहेलिया शिकारी टोळीतील अजित राजगोंड याला सहा दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी त्याला राजुरा येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. अजित हा वाघांच्या शिकारीत तरबेज असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. तब्बल ११ वर्षानंतर अजित विदर्भात परत आल्यामुळे मध्य भारतातून किमान दहा वाघांची शिकार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी अजित आणि त्याच्या कुटुंबीयांना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथून ताब्यात घेतले. गेल्या काही महिन्यांपासून ते वस्तीलगतच डेरा टाकून राहात होते. अजित याच ठिकाणाहून संपूर्ण भारतातील शिकारीची सूत्रे हलवत होता. मात्र, स्थानिक पोलीस पाटील, पोलीस आणि वनविभागाला देखील त्याची कुणकुण लागली नाही. अजितसोबत त्याची पत्नी रिमाबाई, भावाची पत्नी, दोन सुना, आई इंजेक्शनबाई, नातू आदी सोबत होते. शनिवारी या सर्वांनाच ताब्यात घेण्यात आले. रविवारी अजितला अटक करून सहा दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. सोबत असणाऱ्या इतरांना मात्र सोडण्यात आले. अजितला ताब्यात घेत असतानाच त्याचा भाऊ केरू आणि साथीदार शेरू पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य देखील सापडले. दरम्यान, त्यांच्या भ्रमाणध्वनीवरून आता तब्बल ७० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वनखाते या व्यवहाराने हादरले असून सोडण्यात आलेल्या अजितच्या कुटुंबियांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे.

यापूर्वी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक

मेळघाट येथे मे २०१३ मध्ये ढाकणा येथे वाघाची शिकार उघडकीस आली, त्यानंतर २९ मे २०१३, ८ जून २०१३ अशा एकापाठोपाठ एक वाघाच्या शिकारी उघडकीस येत गेल्या. त्यावेळी तब्बल २० वाघांची शिकार झाल्याचे समोर आले. याच प्रकरणात अजितला यापूर्वी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने अटक केली होती. यात त्याला शिक्षाही झाली. ती पूर्ण केल्यानंतर तो सुटला. तर अलीकडेच २०२३ मध्येही वाघांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वाघ बेपत्ता!

राज्यातून आणि विशेषत: विदर्भातून गेल्या एक-दोन वर्षात अनेक वाघ बेपत्ता झाल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. पेंचमध्ये अलीकडेच ज्या दोन बछड्यांचा उपासमारीने मृत्यू झाला, त्यांची आई बेपत्ता आहे. ताडोबातील जगप्रसिद्ध वाघीण माया बेपत्ता आहे. आतापर्यंत अजितच्या भ्रमणध्वनीवरून सुमारे ७० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या वाघांचीही तर शिकार झाली नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.