अकोला : शहरातील श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानला ब वर्ग दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मंत्रालयातील बैठकीत त्याला मंजुरी मिळाली. यासंदर्भात लवकरच शासन आदेश निघणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. तर आपल्या पाठपुराव्यामुळे संस्थानला ब वर्ग दर्जा मिळाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार साजिदखान पठाण यांनी केला. संस्थानच्या दर्जाच्या श्रेयावरून भाजप व काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

राज्यातील तीर्थक्षेत्र विकास योजनेखाली तीर्थक्षेत्रांचे निकष ठरविण्यासाठी समितीची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये अकोल्यातील श्रीक्षेत्र राजराजेश्वर संस्थानला ब वर्ग दर्जा देण्यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये श्री राजराजेश्वर संस्थांना ब वर्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे.

दरम्यान, मंदिराला ब वर्ग दर्जा देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जून रोजी अकोल्यातील विकास संवाद सभेमध्ये श्री क्षेत्र राजराजेश्वर मंदिर संस्थानला ब वर्ग दर्जा देण्यासह निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १६ जूनला आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून श्री राजराजेश्वर संस्थानला ब वर्ग दर्जा आणि ५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी १८ जून रोजी नगर विकास प्रधान सचिवांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. विकास आराखड्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केला. तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विद्यमान पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून आमदार रणधीर सावरकर यांनी संस्थानला ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी महापालिकेपासून ते मंत्रालयापर्यंत २६ ठिकाणी फाइलचा मार्ग मोकळा करून घेतला. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे संस्थानला ब वर्ग दर्जा मिळाला. आता खोटे श्रेय घेण्याचा प्रकार आ. साजिदखान पठाण करीत आहेत, असा आरोप भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, आमदारकीच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीतसुद्धा हा मुद्दा उचलला होता. त्यावर अजित पवार यांनी लवकरच दर्जा देण्यात येईल, असा शब्द दिला. सातत्यापूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे आ. साजिदखान पठाण यांनी सांगितले.