अमरावती : काम देण्याच्या बहाण्याने एका १९ वर्षीय युवतीची गुजरातमध्ये अडीच लाख रुपयांमध्ये विक्री आणि बळजबरीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील या पीडित तरुणीने गुजरातमधून सुटका करून घेतल्यानंतर अमरावतीत येऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेने पीडित युवतीला काम मिळवून देण्याचे सांगत जवळीक साधली. स्वयंपाकाच्या कामासाठी मुर्तिजापूर येथे घेऊन जात असल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगून युवतीला बडनेरा रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. मात्र तिथून मूर्तिजापूर येथे न नेता तिला गुजरातमधील बच्छाव नजीकच्या ओंध या गावी नेण्यात आले. त्या ठिकाणी मुलीची एक परिचित महिला होती. तिच्या घरी हे सर्व थांबले. दोन ते तीन दिवसांनी पीडित तरुणीची त्याच गावातील साले नामक व्यक्तीसोबत भेट घालून देण्यात आली. त्यानंतर सालेच्या घरी ही तरुणी आठ दिवस राहिली. नंतर तरुणीला घेऊन साले बच्छावमधील महिला मंडळ येथे गेला. त्याठिकाणी राजेश बेला नामक व्यक्तीसोबत तरुणीचे इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्यात आले.
लग्नाची तारीख तरुणीला आठवत नाही. या लग्नात साले, त्याची पत्नी, राजेशचे आई व वडील उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर पीडित तरुणी राजेशच्या घरी कनकोटला राहायला गेली. त्या ठिकाणी तरुणी जवळपास दोन महिने राहिली. मात्र तेथील मंडळी तरुणीसोबत चांगले वागत नव्हती. त्यामुळे तरुणीला त्या ठिकाणी करमत नव्हते. दरम्यान तरुणीला राजेशपासून वेगळे व्हायचे होते. त्यामुळे राजेश, तरुणी व राजेशचे आई वडील हे सर्व बच्छावच्या महिला मंडळात पोहोचले. त्यावेळी तरुणीला समजले की, या लग्नासाठी साले व इतरांनी २ लाख ६० हजार रुपये घेतले आहे.
त्यानंतर तरुणी सालेच्या घरी आली. तेथून एका परिचित महिलेच्या घरी ओंधला आली. त्यानंतर त्या तरुणीच्या बँक खात्यावर तरुणीच्या आईने गावातून एक हजार रुपये पाठवले. त्याच एक हजार रुपयांमुळे रेल्वेचे तिकीट काढून तरुणी बच्छाववरून निघाली आणि अमरावतीत पोहोचली. त्यानंतर मुलीने थेट वलगाव पोलीस ठाणे गाठून हा घटनाक्रम सांगितला. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.