यवतमाळ : ‘मानव सेवा हीच माधव सेवा’ या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या उपदेशाने प्रेरीत होऊन सर्वधर्मीय गरीब, गरजू कुटुंबातील विवाहयोग्य १०८ मुला-मुलींचे विवाह अतिशय थाटामाटात लाऊन देण्याचे कार्य रविवारी येथील हॉटेल वेनिशिएनमध्ये पार पडले. वधूंना यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.
बंगळुरू येथील साई मेरु मथी ट्रस्ट व सत चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ तथा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बंगलोर येथील द्वारकानाथ स्वामी, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. प्रकाश नंदूरकर आदिंची उपस्थिती होती. १९९४ पासून सर्वधर्मीय विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील सेवाभावी व दानशूर दात्यांच्या सहकार्याने हे कन्यादानाचे काम अखंड सुरू असून, आजवर दोन हजारच्या वर विवाह पार पडले आहेत.
विवाह सोहळ्यात सहभागी वर-वधूंना लग्नाचे कपडे, संसारोपयोगी वस्तू व वधूला सोन्याचे मंगळसूत्र भेट देण्यात आले. मुस्लिम,बौद्ध व हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आले. या विवाह सोहळयात एक मुस्लिम, ३३ बौद्ध धर्मीय व ७४ हिंदू धर्मीय जोडपी विवाहबद्ध झाली. याप्रसंगी आपल्या संपर्कातून विवाह जोडपी आणणार्या आशा सेविकांचा साडी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अजय मुंधडा, किशोर दर्डा, सुरेश राठी, प्रशांत बनगिनवार, अनंत कौलगीकर, राजेश्वर निवल, राजू पडगीलवार, राजू डांगे, डॉ. उल्हास नंदुरकर, डॉ. राम नंदूरकर, सचिन देऊळकर, अॅड. उमेश बावनकर,अॅड. राजेंद्र गटलेवार आदींची उपस्थिती होती.