मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन बालसाहित्यात कालानुरूप परिवर्तन होत आहे. विविध माध्यमांचाही त्यावर प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची वाचनाची गोडी कमी होत असून ती टिकवण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यात त्यांची ही रुची वाढवण्याकरिता ऑडिओ बुक हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. रविवारी ‘मुलांचे मासिक’च्या ९० व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या सोहळ्याला महारोगी समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, महापौर प्रवीण दटके, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे, ‘मुलांचे मासिक’चे संपादक जयंत मोडक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या ९० वर्षांपासून या मासिकासह इतरही बालसाहित्य मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढवत आहे. पूर्वी छापील साहित्य असायचे. त्यात ई-मिडियाची भर पडली,. यामुळे विदेशातीलही मराठी माणूसही ही पुस्तके वाचू शकतो. विदेशात स्थायिक झालेल्या वा विविध कामाकरिता गेलेल्या मराठी कुटुंबानाही आपला मुलगा आपली संस्कृती शिकावा म्हणून त्याने हे साहित्य वाचावे, असे वाटते. तेव्हा सगळ्यांनीच हा बदल स्वीकारण्याची गरज आहे. मुलांमध्ये साहित्याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणून ते ऑडिओ बुकच्या स्वरूपात आल्यास त्याचा मुलांना लाभ शक्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे, प्रवीण दटके, आशा बगे यांनीही मार्गदर्शन केले. नागपूरकरांनी विलंबाने येण्याची सवय न बदलल्याचे समाधान मुख्यमंत्री झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून मी मुंबईला राहत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सकाळी वेळेवर १० वाजता पोहोचल्यावरही ८० टक्के श्रोते आले नसल्याचे मला दिसते. त्यामुळे अद्याप नागपूरकर बदलले नसल्याचे मला समाधान असून मुंबईला गेल्याने वेळेवर पोहोचण्याची माझी सवय मात्र बदलल्याचा विनोद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना चांगलाच टोला लगावला.