बुलढाणा: वारकरी पंढरीचा ! धन्य धन्य जन्म त्याचा !!
जाये नेमें पंढरीसी ! चुको नेदी तो वारीसी !!
आषाढी कार्तिकी ! सदा नाम गाय मुखी !!
एका जनार्दनी करी वारी ! धन्य तोचि बा संसारी !!

अशा सार्थ शब्दात संत एकनाथ महाराज यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्व विषद केले आहे.वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असलेल्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी शेगाव येथील गजानन महाराजांची पालखी सहभागी होते. परंपरे नुसार यंदाही श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी २ जून रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे.

श्रींच्या पालखीत जवळपास  सातशे  वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, हरीनामाच्या गजरात, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जप करीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते. जो नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय. श्रीसंत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविल्या जाते. पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारक-यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या ५५  वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे.

२ जून रोजी महाराजांची पालखी विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत,गाजत, शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात. श्रींच्या दिडीमध्ये,पताकाधारी, गायक, मुंदगवादक, सेवेकरी अशा एकूण सातशे  जणांचा समावेश असतो. या दिंडीमध्ये एक विणेकरी व स्वयंशिस्तीने टाळकरी व पताकाधारी चालत असतात. मजल दरमजल करत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, तेथे भजन, कीर्तन, प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात. मार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते. दिवसभर वारी आणि रात्रीचा मुक्काम, मुक्कामाचे दिवस आणि गावे ठरलेली असतात. मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा, हरीपाठ, रस्त्याने भजन, श्रीची आरती, प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने रोज होतात.

मजल दरमजल करत मुखी संताचे अभंग गात पाउले श्रद्धेने पंढरीकडे चालत असतात. पाऊस असो वा ऊन, वारा अथवा थंडी असो, चालताना विठ्ठल दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांना पुरेशी असते. प्रत्यक्ष श्रीसंत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व सुखाचे आगर सोबत असल्याची भावना असते.

एक महिन्यांची साधना

तब्बल ३३ दिवसांचा पायी करून श्रींची पालखी ४ जुलै रोजी पंढरपुरी येथे पोहोचणार आहे. वारकरी पंढरीच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी तेथील माती कपाळाला लावून जणू विठ्ठलमयच होऊन जातात.

असा आहे प्रवास

श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास पुढीलप्रमाणे आहे.२ जुन रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. ३ जुन रोजी पारस येथून गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे ४ व ५ जुन असे दोन दिवस मुक्काम राहील. ६ जुन रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव, ७ जुन रोजी देऊळगाव (बाभूळगाव)-पातूर, ८ जुन मेडशी-श्री क्षेत्र डव्हा, ९ जुन मालेगाव- शिरपूर जैन, १० जुन चिंचापा पेन-म्हसला पेन, ११ जुन किनखेडा-रिसोड, १२ जून पानकन्हेरगाव-सेनगाव, १३ जुन श्री क्षेत्र नरसी (नामदेव) – डिग्रस, १४ जून श्री क्षेत्र औंढा नागनाथ-जवळा बाजार, १५ जुन हट्टा (अडगांव रंजोबा) श्री क्षेत्र त्रिधारा, १६ जुन परभणी- परभणी, १७ जून ब्राह्मणगाव दैठणा, १८ जुन खळी – गंगाखेड, १९ जुन वडगाव (दादा हरी) परळी (थर्मल), २० जुन  परळी- परळी वैजनाथ, २१ जुन  कन्हेरवाडी- अंबाजोगाई, २२ जुन लोखंडी सावरगाव – बोरी/सावरगाव, २३ जुन गोटेगाव – कळंब, २४ जुन गोविंदपूर – तेरणा साखर कारखाना, २५ जुन किनी – उपळा (माकडाचे), २६ जुन ज्ञानेश्वर महाराज मंदिर (धाराशिव) धाराशिव, २७ जुन वडगाव सिद्धेश्वर- तुळजापूर, २८ जुन सांगवी, ऊळे, २९ जुन सोलापूर, सोलापूर, ३० जुलै सोलापूर – सोलापूर, १ जुलै सोलापूर, तिन्हे, २ जुलै कामती खु. (वाघोली) माचनूर, ३ जुलै ब्रह्मपुरी, श्री क्षेत्र मंगळवेढा, ४ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा व रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी पोहचणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४ जुलै ते ९ जुलै पर्यंत श्री क्षैत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील.१० जुलै २०२५ रोजी श्री क्षैत्र पंढरपूर येथुन श्रींच्या पालखी परतीच्या प्रवासाला निघेल. ३१ जुलै २०२५ वार गुरुवार रोजी संत नगरी शेगांव येथे दाखल होणार आहे.