यवतमाळ : वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘युजीसी नेट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना ५०० किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रे दिल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावर वर्षातून दोनदा ‘नेट’ प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. आजवर या परीक्षेसाठी केंद्र म्हणून परीक्षार्थीनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार विद्यापीठ असणाऱ्या गावातील केंद्रे दिली जायची. यावर्षी मात्र नेट परीक्षा आयोजकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्राच्या प्राधान्य सूचीला डावलून अक्षरशः ४००, ५०० किलोमीटर अंतरावरची परराज्यातील भोपाळ, हैदराबाद अशी आणि राज्यातील औरंगाबादसारखी परीक्षा केंद्रे यवतमाळ, वर्धा, अमरावतीतील विद्यार्थ्यांना दिलेली आहेत. ९०० रुपये प्रवेश शुल्क भरून या परीक्षेला बसावयाचे आणि परीक्षा देण्यासाठी तब्बल दोन ते तीन हजार रुपये प्रवासात खर्च करायचे हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न परीक्षार्थी विचारत आहेत. हेही वाचा >>> हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीच्या छाप्यानंतर प्रफुल्ल पटेलांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले… सोबतच या परीक्षा केंद्राबद्दलची सूचना केवळ चार ते पाच दिवस अगोदर मिळाल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना भोपाळ, हैदराबादला जाण्यासाठी आरक्षण मिळण्याची सुद्धा सोय उरलेली नाही. आर्थिक स्थिती अतिशय बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पैशाची व्यवस्था कशी करावी? तर मुलींच्या संदर्भात अनोळखी शहरात परीक्षेला जाताना येणारा ताण आणि सोबतीला पालकांना नेल्यास वाढणारा खर्च इत्यादी प्रश्न उभे ठाकले आहेत. परीक्षा केंद्राचा हा घोळ संबंधित यंत्रणा निस्तरेल का? हा प्रश्न सारिका सावरकर, कबीर दरणे, आदी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी युजीसीने तत्काळ पावले उचलून परीक्षार्थींना त्यांच्या प्राधान्यक्रमाची परीक्षा केंद्रे देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.