नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा अ‍ॅड. सतीश उके यांनी केला आहे. याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत निर्णय राखून ठेवला. यावर ते ५ सप्टेंबरला निर्णय देणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे.

या प्रकरणात फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली  आहे. यापूर्वी अ‍ॅड. उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी सांगितले की, नजर चुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते.

हेही वाचा >>> “भाजपला सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पुन्हा…”, प्रणिती शिंदे यांचा सावधानतेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्यांविषयी माहिती न देण्याचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. तसेच प्रत्येक निवडणूकीला फडणवीस यांना मिळणाऱ्या मतदानाची संख्या ही वाढतच आहे. मंगळवारी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. येत्या ५ सप्टेंबर रोजी ते निर्णय देणार आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. उदय डबले, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली तर अ‍ॅड. सतीश उके कारागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बाजू मांडली.