चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) येथील शुभांगी मनोज चौधरी (३८), कांताबाई बुधा चौधरी (६०) आणि रेखा शालिक शेंडे (४८) अशी मृत महिलांची नावे आहेत. याशिवाय एक महिला जखमी आहे.

सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुष यासाठी जंगल परिसरात जात असतात. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास या चार महिला देंतूपाने तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यादरम्यान तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर हल्ला केला. यात शुभांगी आणि कांताबाई चौधरी या सासू-सुना व रेखा शालिक शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वंदना विनायक गजभिये (५०) या जखमी झाल्या.

घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी सिंदेवाही येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू आणि एक महिला गंभीर जखमी झाल्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तेंदुपाने संकलनाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने अधिक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.