नागपूर : नरेंद्र मोदी हे भारताचे पंधरावे पंतप्रधान असून त्यांनी सलग तीन वेळा ही जबाबदारी सांभाळली आहे. नरेंद्र मोदी २६ मे २०१४ रोजी प्रथमच पंतप्रधान झाले. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत पूर्ण बहुमत मिळवले होते. त्यानंतर ३० मे २०१९ त्यांनी रोजी दुसऱ्यांदा शपथ घेतली. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमत मिळवले आणि नरेंद्र मोदी यांनी ९ जून २०२४ रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून कार्यकाळाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा स्थितीत अलिकडेच सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेल्या न्या.भूषण गवई यांनी मोदी यांच्या पंतप्रधान यांच्या पदावर भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर कशामुळे पोहोचले यावर सरन्यायाधीश गवई यांनी विधान केले. सरन्यायाधीश गवई यांनी लंडनच्या ग्रेज इन येथे आयोजित व्याख्यानात हे विधान केले.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई सध्या युनायटेड किंगडमच्या (युके) दौऱ्यावर आहेत. युकेमध्ये न्या.गवई सातत्याने अनेक कार्यक्रमात सहभाग घेत असून अनेक महत्वपूर्ण विधान करत आहे. दोन दिवसांपूर्वी युकेच्या सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत मोठे विधान केले होते. न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर लगेच शासकीय पद स्वीकारल्याने किंवा निवडणुका लढवल्याने न्यायिक नैतिकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो. यामुळेे लोकांचा न्यायपालिकेवरील विश्वास ढासळतो, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी निवृत्त न्यायाधीशांना इशाराच दिला होता. आता त्यांनी थेट पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यावर भाष्य केले. न्या. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळेच सर्वसामान्य पार्श्वभूमीच्या व्यक्तीला भारताच्या सर्वोच्च पदांवर पोहोचण्याची संधी मिळाली, असे नम्रपणे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी जन्माने अस्पृश्य नव्हे, तर भारतीय नागरिक म्हणून जन्मलो, हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले,” असे ते म्हणाले. संविधानाचे ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशाने दोन महिला राष्ट्रपती बघितल्या. सध्याच्या राष्ट्रपती केवळ महिला नाहीत तर वंचित आदिवासी घटकातून येतात. भारताने महिला पंतप्रधान, दलित सरन्यायाधीश, दोन दलित लोकसभा अध्यक्ष बघितले आणि सध्या संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाची राष्ट्रपती महिला आहे, आदिवासी घटकातून आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागासवर्गीय घटकातून येतात आणि संविधानामुळेच हे शक्य झाले असल्याचे अभिमानाने सांगतात, असेही सरन्यायाधीशांनी भाषणात सांगितले. डॉ. आंबेडकरांनी मांडलेली स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही त्रिसूत्री एकत्रितपणे लोकशाहीची खरी ताकद आहे, असे मतही गवई यांनी अधोरेखित केले.