गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली महामार्गावर घडलेल्या अपघाताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत मृत मुलांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत व जखमींना हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूर येथे नेण्यात आले. त्यांच्यावर सरकारी खर्चातून उपचार करण्याच्या सूचनाही केल्या. सोबतच गडचिरोली दौऱ्यावर असलेले राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट दिली व मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अपघातानंतर घटनास्थळावर संतप्त गावकऱ्यांनी ठिय्या दिला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती

भुसे यांच्या भेटीदरम्यान अनेक ग्रामस्थ शोकाकुल अवस्थेत होते. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांशी मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी थेट संवाद साधला. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. “दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन तुमच्या सोबत असून योग्य ती मदत आणि कारवाई केली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

शासनाकडून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. गावकऱ्यांनीही या वेळी आपल्या व्यथा मांडल्या आणि महामार्गावरील वाहतुकीच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.

मृतकांना श्रद्धांजली

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार मुलांना मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सभागृहात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून चार लाख रुपये मदत घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण विभागाने अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा नियमाप्रमाणे देय लाभ मृतांच्या परिवाराला तात्काळ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.