नेत्यांच्या स्वच्छतेच्या स्वप्नांचे ओझे निमूटपणे वाहून नेणारी म्हणून नागनदीला एखादा पुरस्कार मिळायला हवा. नदी वाहती असते म्हणून ती जिवंत असते असे आपण समजत असतो. ही नदी वाहती आहे का, असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. वस्तुस्थिती जाणणाऱ्यांना त्याचे उत्तरही ठाऊक आहे, पण स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या नेत्यांनी या नदीला जिवंत ठेवले आहे. उगमातून सतत पाणी बाहेर पडणे हे नदीच्या जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. नागनदी त्याबाबतीत कधीचीच दुर्दैवी ठरली आहे. उगमस्रोत आटलेली ही नदी हजारो नागपूरकरांची घाण वाहून नेत असते. तिच्या मूक आक्रंदनाची दखल सामान्य नागपूरकर कधी घेताना दिसत नाहीत, पण मिरवण्याची हौस असलेले नेते मात्र या नदीकडे मधून मधून लक्ष देत असतात. खरे तर ही नागनदी नेत्यांच्या चमकोगिरीसाठी एक उत्तम साधन ठरली आहे. साधन वापरून घेणे आणि साध्याचा विचार न करणे हे कोणत्याही नेत्याचे महत्त्वाचे लक्षण असते. परिणामी, या नदीचा वापर करून साध्य काय झाले, याचा विचार नेत्यांच्या मनात येणे शक्यच नसते आणि इतर तो करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या साऱ्या घटनाक्रमात नदीची कुत्तरओढ तेवढी होत राहते. नागनदीच्या बाबतीत नेमके तेच घडत आहे. सध्या देशात स्वच्छतेचे मोसमी वारे जोरात वाहात असले तरी ही नदी मात्र बरीच नशीबवान ठरली आहे. तिच्यावर एक वर्ष आधीच म्हणजे २०१३ पासूनच स्वच्छतेचे प्रयोग सुरू झाले. असले प्रयोग केवळ नेत्यांनी दाखवणे पुरेसे नसते. त्यात लोकसहभाग महत्त्वाचा असतो. तोही या नदीच्या नशिबी आला. चला आता आपण स्वच्छ होऊ असे म्हणत एक मोठा उसासा या नदीने सोडला, पण तो केवळ नेत्यांच्या कानावर गेला; इतरांना तो ऐकूच गेला नाही. यातून सुरू झाली ती स्वच्छतेची दिखाऊ मोहीम! गेली चार वर्षे ती सुरूच आहे, पण ही हटवादी नदी स्वच्छ व्हायचे नावच घेत नाही. स्वच्छतेचा ध्यास जळी, स्थळी, काष्ठी बाळगणारे नेते दरवर्षी गणपती बसवल्याप्रमाणे या नदीला स्वच्छ करत असतात. त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. अनेक सार्वजनिक उपक्रमांचा निधी त्यासाठी वापरला जातो. पण तरी ती काही स्वच्छतेचे नाव घेत नाही. ती घेणार तरी कशी? कारण तिला अस्वच्छ करण्याचे प्रयत्न दुसरीकडे जोमाने सुरूच असतात. सामान्य नागपूरकरांनी या नदीला अस्वच्छ करायचे व नेत्यांनी स्वच्छ करायचे, असा दुहेरी व जगातला एकमेव प्रयोग ही नदी गेली काही वर्षे अनुभवते आहे. या नदीला स्वच्छ करायचे असेल तर आधी तिचे अस्वच्छ होणे थांबवावे लागेल असे एकाही नेत्याला वाटत नाही. या नदीत सोडली जाणारी घाण व सांडपाण्याचा रतीब कसा थांबवता येईल, या प्रश्नाचे उत्तर साऱ्यांना ठाऊक असताना सुद्धा त्या उत्तराच्या दिशेने जायला नेते तयार नाहीत. कारण ज्या दिशेला हे उत्तर आहे तिथली वाट खडतर आहे. खडतर व काटेरी वाट निवडण्यापेक्षा स्वच्छतेचे सोंग आणणे केव्हाही चांगले, याच वृत्तीतून या नदीवर असत्याचे प्रयोग करणे सध्या सुरू आहेत. कोणतेही सोंग असो, ते बेमालूमपणे वठवले तर त्यावर लोकांचा विश्वास बसतो. सध्या राजकारणात हाच बेमालूमपणा ठायीठायी दिसतो. या बाबतीतही ही नदी दुर्दैवी ठरली आहे. तिच्यावर आधारलेले स्वच्छतेचे सोंग नेत्यांना उघडे पाडणारे आहे. उन्हाळा आला की नदीतला गाळ काढायचा, तो काठावर टाकायचा व तसाच ठेवून द्यायचा. नंतर पावसाळा सुरू झाला की तोच गाळ पुन्हा नदीत. असे तकलादू आवर्तन गेली काही वर्षे सुरू आहे. त्यामुळे सामान्यांना सुद्धा या सोंगाचे काही सोयरसुतक वाटत नाही. नेते मात्र त्यांच्या सोंगात मश्गूल आहेत. त्यांना सामान्यांची काही चिंता नाही. स्वच्छता किती होते हे महत्त्वाचे नाही, त्याचा गजर किती होतो ते महत्त्वाचे, या तत्त्वावर या नेत्यांचा ठाम विश्वास आहे. कारण हा गजरच सर्वोच्च नेतृत्वाचे लक्ष वेधून घेणारा असतो. स्वच्छतेचे प्रयोग सहन करणाऱ्या या नदीने आजवर अनेक घोषणा ऐकल्या आहेत. मोठी स्वप्ने दाखवण्यात पारंगत असलेल्या एका नेत्याने या नदीतून लवकरच बोट चालेल, बदके विहार करतील, तिला लंडनच्या थेम्सनदीचे रूप देऊ अशा घोषणा केल्या. या घोषणांचा वास्तवाशी संबंध आहे हे दर्शवण्यासाठी दीक्षाभूमीतून काही बदकेही पात्रात असलेल्या पाण्यात सोडण्यात आली. हा बदकांचा विहार आनंदाने स्वीकारणाऱ्या नदीला अगदी मोरपीस अंगावर फिरते आहे असेच क्षणभर वाटले. मात्र नेते निघून गेले आणि त्यांच्या पाठोपाठ ही बदकेही बिचारी नेत्यामुळे आपल्याला सहल घडली या आनंदात स्वगृही परतली. नदी मात्र पुन्हा बोडखी झाली. या नदीतील दूषित व घाण पाणी शुद्ध करण्याच्या घोषणा याच काळात निनादल्या. त्यासाठी चार ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार असेही जाहीर झाले. दरवर्षी स्वच्छतेचा भार सहन करणाऱ्या या नदीला ही केंद्रे अजूनतरी दिसलेली नाहीत. आताशा तिलाही या घोषणांची सवय झालेली आहे. राजकारणासाठी आपला वापर होतो, हेही या नदीला कळून चुकले आहे. मात्र तिला व्यक्त होता येत नाही. अगदी गाईसारखी तिची अवस्था होऊन गेली आहे. ही नदी जिवंत असली तरी घाण पाणी वाहून नेऊन नेऊन स्वत:चे प्रवाहीपण हरवून बसली आहे. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या नदीला स्वच्छतेच्या सोंगाच्या माध्यमातून दिलासा देण्याची मलमपट्टी दरवर्षी केली जात आहे. यात तिचा आजार बरा होण्याची सुतराम शक्यता नाही, पण नेत्यांचे स्वच्छतेचे सोंग मात्र लोकांच्या नजरेत स्थिरावले आहे. हे सोंग नाही तर चक्क ढोंग आहे, हे लक्षात यायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तोवर मात्र या नदीला हे सारे प्रयोग सहन करावे लागणार आहेत. कारण यावरच नेत्यांचे कर्तृत्व फुलणार आहे. सार्वजनिक उपक्रमांची समाजसेवा सिद्ध होणार आहे व कंत्राटदारांच्या घशात पैसा जाणार आहे. यात मी कुठे आहे? माझ्या पुनरुज्जीवनाचे काय? हा नदीला पडलेला प्रश्न कुणाच्या ध्यानीमनीही नाही. हाच तर खरा ग्रेट ‘नाग’ शो आहे.
devendra.gawande@expressindia.com