गडचिरोली : काँग्रेसने राजकारणासाठी धार्मिक स्थळांचा नेहमीच वापर केला, ही बाब त्यांच्यासाठी नवीन नाही, असा आरोप राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नीतेश राणे यांनी केला. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौरा करावा व स्थानिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घ्याव्यात, या मागणीसाठी ६ जून रोजीच्या काँग्रेसने आयोजित केलेल्या महायज्ञावरून राजकारण तापले आहे.

मंत्री राणे हे आज, ४ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसने ६ जून रोजी शहराजवळील सेमाना हनुमान मंदिरात ‘दर्शन देगा देवा भाऊ’ महायज्ञ आयोजित केला आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोलीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे या जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.

नवे उद्योग येत आहेत. मात्र, काँग्रेसला स्वत:ला काही करायचे नाही आणि कोणी काम करत असेल तर तेही आवडत नाही, त्यामुळेच जनतेने त्यांना सत्तेबाहेर बसवले आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांना अशा प्रकारची आंदोलने सुचतात. मात्र, यास स्थानिक भाजप पदाधिकारी चोख उत्तर देतील. यासंदर्भात योग्य ती भूमिका घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास महायुती मजबूत होईल

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नुकतेच दोन्ही राष्ट्रवादी एक येतील, असे विधान केले होते. याबाबत मंत्री नीतेश राणे म्हणाले,

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास महायुती बळकट होणार आहे. कोण नाही बोलणार या गोष्टीला. मात्र, हा निर्णय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसलाच घ्यायचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील लाेकांचे प्रश्न ऐकावेत, प्रशासन कामाला लावावे, यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी दाैरा केला नाही. त्यामुळे शेवटी देवाकडे साकडे घालण्यासाठी महायज्ञ आयाेजित करण्यात आला आहे. यात धार्मिक स्थळाचा वापर कुठे आला? जे धर्माच्या नावावर राजकारण करतात त्यांनाच अशा प्रकारची वक्तव्ये सुचतात, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिले.