नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भातील वक्तव्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या विधानात दुरुस्ती करून आणखी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेल तर आधी ओबीसींचे २७ टक्के असलेले आरक्षण वाढवण्यात यावे. त्यासाठी आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा काढून टाकावी, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावर ओबीसी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वडेट्टीवार यांनी नवी भूमिका घेतली आहे.
हेही वाचा : पटोले, वडेट्टीवारांमुळेच ओबीसी-मराठा समाजात तेढ, परिणय फुके यांचा थेट आरोप
वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाची भावनिक मागणी आहे. सरकारला ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल तर आमचा (ओबीसी) वाटा सोडून आरक्षण देता येणार नाही. ओबीसी-ए आणि ओबीसी-बी अशी वर्गवारी करता येईल. त्यासाठी आधी ओबीसींचे आरक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला ओबीसींचे मत हवे आहे. परंतु त्यांच्यासाठी काही करायचे नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी आज येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.