यवतमाळ : तारण गहाण स्थावर मालमत्ता कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यांच्या संगणमताने नोंदवून थकीत कर्जदारांना मुक्त करत बँकेची १० कोटीहून अधीक रक्कमेची फसवणूक करण्यात आली. ही घटना शहरातील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लि. यवतमाळ येथे घडली. या प्रकरणी शनिवारी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात बँकेच्या माजी उपाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक बाबाजी दाते महिला सहकारी बँक लि. यवतमाळ यांच्यासह पाच जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.महिला सहकारी बँकेचे अवसायक नानासाहेब सयाजीराव चव्हाण ( ४०, रा. यवतमाळ), अनुपमा आनंदराव जगताप (६०, अतुल आनंदराव जगताप (४५), सचिन साहेबराव जगताप (४५), तिघेही रा. शिवाजी नगर, यवतमाळ आणि राजेंद्र लक्ष्मणराव वरटकर (५३) श्रध्दा नगर, यवतमाळ अशी गुन्हे दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा अॅड. मनिषा कुळकर्णी यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, महिला बँकेचे अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती सहकार आयुक्तांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी केली होती. तेव्हापासून बँकेचे सर्वस्वी अधिकार चव्हाण यांच्याकडे आहेत. तर मे. ए. जी. जगताप फर्मच्या अनुपमा जगताप, अतुल जगताप आणि सचिन जगताप हे विद्यमान भागीदार असून, एक भागीदार आनंदराव जगताप यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सप्टेंबर २००५ पासून मे. ए. जी. जगताप फर्मने बाबाजी दाते महिला सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्जाची उचल केली. कर्ज आणि व्याज, अस मिळून एकूण दहा कोटी रूपये जगताप फर्मकडे होते. हेही वाचा >>>“नेते, उद्योगपतींनंतर आता ईडी व्यापाऱ्यांना छळणार, सावध व्हा”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा; म्हणाले… विशेष म्हणजे कर्जाचा भरणा न केल्यामुळे मे. ए. जी. जगताप फर्म विरोधात अमरावती येथील सहकार न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते. हे दाखल प्रकरण मागे घेण्याकरीता अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी वकिलांना पत्र दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या पत्रात प्रकरण मागे घेण्याबाबत स्पष्टपणे कुठलीही नोंद नव्हती, असेही पालिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार अवसायकांनी आरोपींसोबत संगनमताने केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. त्याचप्रमाणे एक कोटी २० लाख रूपयांच्या कर्ज खात्याला गहाण असलेली मालमत्ता रिलीज करून द्यावे, असेही लेखी पत्र अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी राजेंद्र वरटकर यांना दिले होते. त्या पत्राच्या आधारावर १ फेब्रुवारी २०२४ रोजी फर्माच्या भागीदार अनुपमा जगताप यांच्या हक्कातील कर्जमुक्त करण्याचा लेख (रिलीज डिड) करून दिला. अवसायकांसह इतरही चौघांनी संगणमत करून खोटे कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप, आणि राजेंद्र वरटकर या पाच जणांवर फसवणुकीचे गुन्ह दाखल करण्यात आले आहे.