रावसाहेब दानवेंचे प्रत्युत्तर, कोणाला तडीपार करायचे जनता ठरवेल

शिवसेना नेत्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. कोण कोणाला तडीपार करणार, याचा निर्णय जनता घेईल, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेने केलेल्या तडीपारीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
भाजपच्या वर्षपूर्ती कार्यक्रमासाठी शनिवारी दानवे नागपुरात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सत्तारूढ भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध शिगेला पोहोचले आहे. भाजपला सत्तेतून तडीपार करू, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सरकार चालविण्याची जबाबदारी ही दोन्ही पक्षांची आहे. शिवसेनेने तडीपार करण्याची भाषा वापरली असली तरी तडीपार कोण कोणाला करेल, हे जनता ठरवेल. तो अधिकार शिवसेनेला आणि भाजपला नाही. शिवसेनेने यापूर्वीही अनेकदा धमक्या दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. शिवसेना केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेनेने विचार करावा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाचे निर्णय होतात. त्या वेळी सेनेचे मंत्रीही उपस्थित असतात. त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. पाक कलावंतांना शिवसेनेचा विरोध असला तरी त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचे राजीनामानाटय़ आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक भाजपच जिंकणार आहे. शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांची ३ नोव्हेंबरला मुंबईत होणारी बैठक ही त्यांची नियमित बैठक आहे. दोन्ही पक्षांतील तणाव निवळण्यासाठी लवकरच समन्वय समितीची बैठक होणार आहे, असेही दानवे म्हणाले.

नागपूरला दोन मंत्रिपदे
राज्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नागपूरला आणखी दोन मंत्रिपदे देण्यात येणार आहेत, असे दानवे यांनी सांगितले.