भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघातावरुन काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का, अशी शंकाही अतुल लोंढेंनी उपस्थित केली आहे.

हेही वाचा – नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भारधाव ट्रकची धडक

हेही वाचा – भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. ही अत्यंत गंभीर घटना असून यामागे घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे नाना पटोलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.”