नागपूर: जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित पदासाठी २० व २१ फेब्रुवारीला टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील, अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट ‘ब’ संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी टीसीएस कंपनीमार्फत राज्यातील २८ जिल्ह्यातील ६६ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. २१ फेब्रुवारीला ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती येथील परीक्षा केंद्रावर यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या छायांकित प्रतिवर खालील बाजूस उत्तरसदृश मजकूर आढळला हाेता. या अनुषंगाने गृह विभागाच्या अहवालानुसार, अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार, १३ आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये टीसीएस कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा समावेश आहे.

हेही वाचा – उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेने साताऱ्यात कार्यकर्ते आक्रमक, भाजपा जिल्हाध्यक्षांनाच घातला घेराव

परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच या परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. परीक्षा रद्द करावी व प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी, अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर करण्यात आली.

हेही वाचा – कराळे गुरुजी म्हणतात, ‘पैसे जुळवितो, तिकीट द्या…’, तर हर्षवर्धन देशमुख म्हणतात, ‘लढतो पण पैसे नाही…’ – पवार गटात संशयकल्लोळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परीक्षेत झालेला गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी, एकूण परीक्षा कार्यपद्धती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. तरी सर्व संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असेही आयुक्त चव्हाण यांनी सांगितले आहे.