चंद्रपूर : ‘मेन रोड तो झाकी है, पुरा शहर खोदना बाकी है’, असा लक्षवेधी व खोचक नारा देऊन जनविकास सेनेने गांधी चौकातील महापालिका इमारतीसमोर उभ्या असलेल्या आयुक्त विपीन पालीवाल यांच्या चारचाकी वाहनावर खेळण्यातील नकली नोटांची उधळण केली. दरम्यान, भूमिगत गटार योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे.

जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका लाल ब्रिफकेसमध्ये आणलेल्या या नकली नोटा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनावर उधळल्या. केवळ कमिशनच्या हव्यासापोटी व मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपातर्फे ५०६ कोटी रुपयांची नवीन भूमिगत गटार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी केवळ मुख्य रस्तेच नाही तर संपूर्ण शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्यात येतील, असा जनविकास सेनेचा दावा आहे.

नवीन गटार योजनेच्या खोदकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी व या योजनेच्या निविदा प्रक्रियेतील ५० कोटी रुपयांच्या गैर-व्यवहाराची चौकशी करण्यात यावी तसेच १५ वर्षांपूर्वी काम झालेल्या १०० कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले? याची, २३४ कोटी रुपयांची पहिली अमृत पाणीपुरवठा योजना व मनपातील इतर सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जनविकास सेनेची मागणी आहे. माजी नगरसेवक देशमुख यांनी मनापातील कोट्यवधी रुपयांच्या अनेक घोटाळ्यांची पुराव्यासह शासन-प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर शासनाने अनेक निविदा रद्द केल्या, परंतु दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांना पाठवणार एक लाख सह्यांचे पत्र

जनविकास सेनेने आज शहरातील गांधी चौकातून महा-स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली. या अभियानाला रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. गोल बाजार व मुख्य रस्त्यावरील दुकानातही स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. पहिल्या दिवशी एक हजारच्या जवळपास नागरिकांनी या महा-स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेतला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील एक लाख नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठवण्यात येईल. पुढील काही दिवस संपूर्ण शहरात पदयात्रा व कॉर्नर सभा घेऊन एक लाख सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना सोडणार नाही असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला.