नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित समाजाला हजारो वर्षांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करीत बुद्धांच्या समतावादी धम्माच्या छायेत आणले. त्या क्षणाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखले जाते. करोनाच्या जागतिक संकटामुळे यंदाही दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. करोनामुळे यंदा मुख्य सोहळा, पुस्तकांची दुकाने, संस्थांचे स्टॉल नसले तरी बाबासाहेबांवर श्रद्धा असलेल्या त्यांच्या अनुयायांनी दीक्षाभूमीवर करोना नियमांचे पालन करून बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो विजयादशमीचा दिवस होता. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवर विजयादशमी आणि १४ ऑक्टोबर असे दोन्ही दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी मुख्य सोहळ्याचे आयोजन होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देत बाबासाहेबांना अभिवादन करतात. मुख्य सोहळ्याच्या चार दिवसा आधीपासूनच लोकांची येथे गर्दी जमायला सुरुवात होते. संपूर्ण परिसरामध्ये पुस्तके, बौद्ध मूर्ती, फोटोंची दुकाने, विविध संस्था, संघटनांच्या उपक्रमांनी दीक्षाभूमी फुललेली असते. चौका-चौकात अन्नदानाची सोयही केली जाते. मात्र, करोनामुळे मागील वर्षापासून दीक्षाभूमीवरील हे चित्रच बदलले आहे. यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यावर अनेक निर्बंध असले तरी बाबासाहेबांवर श्रद्धा असलेल्या व विविध भागांमधून आलेल्या अनुयायांनी दीक्षाभूमीला भेट देत अभिवादन केले. यात तरुणवर्गाचा समावेश मोठा होता. दीक्षाभूमीवर सकाळी स्मारक समिती सदस्य व भन्तेगणांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भिक्खूगण तसेच स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे व इतरांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी परिसरातील तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर स्तुपाच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला अभिवादन केल्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. दीक्षाभूमीच्या परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात केली होती. संविधान चौकातही काही अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. नियमांचे पालन करा - पालकमंत्री पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीला अभिवादन केले. यावेळी त्यांनी कोविड नियमांचे पालन करावे, प्रशासनाला शिस्त राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले. अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर उद्या येण्याची शक्यता आहे. तथापि, करोनाच्या सावटात स्वयंसुरक्षेसाठी कोविड नियमांचे पालन करावे, गर्दी टाळावी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना शक्यतो आणू नये, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत त्यांनी बैठक घेतली. लसवंतांनाच प्रवेश दिला करोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या अनुयायांच्या प्रमाणपत्राची तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात आला. लहान मुले आणि वृद्धांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची संपूर्ण खबरदारी घेतली. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरणही करण्यात आले.