मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत सेमाडोहच्या जंगलात दोन बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागाच्या पथकाने एका आरोपीला अटक केली असून दोन्ही बिबटे विष प्रयोगातून मारले गेल्याचे निदर्शनास आले आहे. समाडोह गावापासून एक किलोमीटर अंतरावर ५ दिवसांपूर्वी नर व मादी अशा दोन बिबट्यांचा एकाच वेळी मृत्यू झाला होता. या प्रकरणात वन विभागाच्या पथकाने समाडोह येथील एका चाळीस वर्षीय शेळीमालकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीच्या तीन शेळ्या बिबट्यांनी मारल्या होत्या. त्याचा सूड घेण्यासाठी या शेळीमालकाने विष प्रयोग करून ३ बिबट्यांचा बळी घेतल्याचे वन विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हेही वाचा >>> गडचिरोली : बधाई हो…! टी-६ वाघिणीने दिला ४ पिलांना जन्मएकनाथ शिंदे राजेश तायवाडे (४०, रा. सेमाडोह) असे वन विभागाने अटक केलेल्या शेळीमालकाचे नाव आहे. तायवाडेकडे शेळ्या असून त्या समा़डोह जंगल भागात चरण्यासाठी जात होत्या. दरम्यान, या भागात वास्तव्य असलेल्या एक नर व मादी बिबट्याने तायवाडेच्या ३ शेळ्यांचा बळी घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या तायवाडेने २ मृत शेळ्यांवर उंदिर मारण्याचे औषध टाकले. शेळ्या खाण्यासाठी बिबटे आले व ते विषाक्त मांस खाल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत झाला. ही घटना ५ दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर वन विभागाने तपास सुरू केला. मृत दोन्ही बिबट्यांच्या तोंडातून फेस येत असल्यामुळे प्राथमिकदृष्ट्या हा प्रकार विष प्रयोगाचा असल्याचे समोर आले होते. त्या दृष्टीने तपास सुरू असताना वन विभागाच्या पथकाला तायवाडेच्या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूसाठी तायवाडे कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले.