गोंदिया : आठवडाभरापासून पावसाची उघडझाप सुरू असताना सोमवारी पावसाने रौद्ररूप धारण केले. रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यात चौघांचा बळी घेतला असून दीड हजार घरांसह ४१७ गोठ्यांची पडझड झाली.

जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड, शिरपूर आदी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने सर्वच धरणाची वक्रद्वारे उघडण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. दुसरीकडे, संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले.

हेही वाचा – नागपूर: आरोग्य विद्यापीठाकडून डॉक्टरांना कौशल्य विकासासाठी ‘डीएचएफसी’सक्ती

शहरातील फुलचुर नाल्याला आलेल्या पुरामुळे नाल्याशेजारील इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. शहरातील सखोल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार, पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाल्याचे वास्तव पुढे आले. दोन दिवसात १६ घरे पूर्णतः कोसळल्याची नोंद झाली असून १ हजार ४८४ घरांची व ४१७ गोठ्यांची अंशतः पडझड झाली आहे. त्यात चौघांचा बळी या पावसाने घेतला आहे. यात गोंदियात इमारत कोसळून दोन तर आमगाव तालुक्यात एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणात मोसोळ्या पकडण्यासाठी गलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. त्याचबरोबर ४७ छोटी जनावरे दगावली असून ३ हजार कोंबडींचे पिल्लू मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचबरोबर पुराच्या पाण्यात वाहून २४ शेळ्या ठार झाल्या असून सहा शेळ्या वाहून गेल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.

६९ जणांना वाचवले, ८८५ जणांचे स्थलांतर

जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला. विविध गावांत पुरात अडकलेल्या ६९ जाणांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व स्थानिक प्रशासनाकडून रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर नदीकाठावरील गावातील सुमारे ८८५ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

हेही वाचा – Video : गडचिरोलीत पुरामध्ये अडकलेल्या तरुणाने झाडाला पकडून काढले ३६ तास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली. पावसाने आज उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. शेतपिकांचे आणि घरांचे नुकसान झाल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहे.