चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक एम्टा कंपनीत कार्यरत एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणात कंपनी व मृतकाचे नातेवाईकांत आर्थिक मोबदल्याकरीता ग्रामीण रुग्णालय परिसरात बोलणी सुरू असताना काहीही संबंध नसताना शिवसेना (ऊबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे (३८), महेश जीवतोडे (३०), मनीष जेठानी (३८), शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड (३३), यांनी कंपनीचे प्रतिनिधी उदया लक्ष्मण नायक यांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी उदया लक्ष्मण नायक यांच्या तक्रारीवरून कलम ३२४, ५०४, ५०६, ३४, भांदवी अन्वये शिवसेना (ऊबाठा) जिल्हाप्रमुखांसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कंपनीतील एका ठेकेदारी कंपनीत फोरमन पदावर कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या जितेंद्र रामअवतार कर्णधार (वय ३६) या कामगाराचा स्थानिक मार्केट परिसरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. शव विच्छेदन झाल्यावर शव रुग्णवाहिकेत ठेवले होते. दरम्यान (दि.३ ऑक्टोबर) ला सकाळी ११ ते १२ वाजता कंपनीचे चीफ अभियंता उदया लक्ष्मण नायक, अधिकारी नागेंद्र भारती, कंपनीचे पैनल वरील लीगल अधिवक्ता श्रीनिवास व मृतक कर्मचाऱ्याचे पत्नी, नातेवाईक व गावकरी यांच्यात मोबदल्याकरीता वाटाघाटी सुरू होत्या. मृतकाच्या नातेवाईकांनी कंपनीकडे २५ लाखांची मागणी केली मात्र कंपनीने ५ लाख रुपये मोबदला मंजूर केला.

हेही वाचा : गोंदिया : चिचगावटोल्यातील निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त, कारण काय? जाणून घ्या..

मात्र त्याच वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, मनीष जेठानी, महेश जीवतोडे, अमित निब्रड यांनी सदर प्रकरणात कंपनीचे प्रतिनिधी उदया लक्ष्मण नायक यांच्यासह बाचाबाची करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा तणाव वाढण्याचे चिन्ह दिसत असतानाच भद्रावती पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने सध्या मृतकाच्या नातेवाईकांना मंजूर मोबदल्यापैकी पन्नास हजार रुपये दिले असल्याचे समजते.

हेही वाचा : “सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून पत्रकारांच्या घरी छापे, अटकसत्र,” योगेंद्र यादव यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासर्व प्रकरणात मारहाण झाल्यामुळे कंपनीचे अधिकारी तक्रार देऊन निघून गेले, त्यानंतर कंपनी अधिकाऱ्यांनी मार पण खाऊ व पैसे पण देऊ का, अशी भूमिका घेतली असल्याचे समजते. नातेवाईकांशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की, मुकेश जीवतोडे यांनी मधात हस्तक्षेप का बरे केले हे समजू शकले नाही. आमच्या जवळच्या नातेवाईक पैकी कुणीच शिवसेना (ऊबाठा) जिल्हा प्रमुखांना फोन केला नव्हता. न बोलावताही त्यांनी हस्तक्षेप केला. या प्रकरणानंतर अधिकारी आर्थिक मदत करतील का? असा प्रश्न नातेवाईकांसमारे निर्माण झाला आहे.