नागपूर : जिल्ह्याला २०१४ पासून सातत्याने ऊर्जामंत्रिपद मिळाले आहे. परंतु, आजही महापारेषणचे रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) नादुरुस्त झाल्यास शहराला अखंडित वीज पुरवठा करणारी पर्यायी यंत्रणाच उभारण्यात आली नाही. नुकतेच बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने महावितरणला तात्पुरते भारनियमन करावे लागले होते. राज्यात २०१४ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री होते व ते पालकमंत्रीसुद्धा होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूरचेच डॉ. नितीन राऊत ऊर्जामंत्री होते आणि सध्या म्हणजे २०२२ पासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद आहे. त्यामुळे सलग नऊ ते दहा वर्षे नागपूर जिल्ह्याकडे ऊर्जामंत्रिपद आहे. मात्र, त्यानंतरही शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या १३२ केव्हीच्या रोहित्रात बिघाड झाल्यास तातडीने महावितरणला वीजपुरवठा करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे शहरातील मोठा भाग अंधारात बुडतो. दरम्यान, शहरात सध्या महापारेषणचे मानकापूर, उप्पलवाडी, पारडी, बेसा, खापरी, हिंगणा १, हिंगणा २ असे एकूण ७ रोहित्र आहेत. महानिर्मिती अथवा इतर वीज कंपन्यांनी निर्माण केलेली वीज महापारेषण शहराच्या सीमावर्ती भागापर्यंत आणते. येथून ग्राहकांपर्यत वीज पोहोचवण्याचे काम महावितरण करते. बेसा परिसरात नुकतेच १३२ ‘केव्ही’चे रोहित्र ठप्प झाले होते. यावेळी पर्यायी सोय नसल्याने महावितरणने काही प्रमाणात त्यांच्या विविध रोहित्रांमधून वीज वळती करून ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रात्री अचानक विजेची मागणी वाढल्यावर गरजेनुसार भारनियमन करावे लागत होते. त्यामुळे महापारेषणला एखादे रोहित्र बंद पडल्यास पर्यायी मार्गाने ग्राहकांना वीजपुरवठा करणारी यंत्रणा उभारण्याची गरज पुढे आली. महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही बोलण्यास नकार दिला. हेही वाचा - नागपूर: सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना विवेक बाळगा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा राजकीय पक्षांना सल्ला क्षमता आणखी वाढवण्याची गरज महापारेषणकडे सध्या शहराच्या सीमावर्ती भागात ७ रोहित्रे आहेत. त्यातून विविध भागात वीजपुरवठा केला जातो. सातपैकी ५ रोहित्रांवर सध्या ६० टक्यांपर्यंत तर तीन रोहित्रांवर ७० टक्केहून अधिक भार आहे. त्यामुळे ही क्षमता आणखी वाढवण्याची गरज आहे. हेही वाचा - नागपूर ‘एम्स’ला ‘एनएबीएच’ मानांकन, देशात पहिलेच रुग्णालय, पंतप्रधानांकडून अभिनंदन नागपूर महानगर असून मोठी रुग्णालये येथे आहेत. त्यामुळे शहराला २४ तास वीज मिळायला हवी. मात्र, शासनाने अद्यापही महापारेषणचे मोठे रोहित्र बंद पडल्यास इतर यंत्रणेतून पर्यायी वीज देणारी व्यवस्था निर्माण केली नाही. नागपुरातील बेसासारख्या घटनेचा धोका टाळण्यासाठी शासनाने तातडीने ही यंत्रणा उभारण्याची गरज आहे. - कृष्णा भोयर, सचिव, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.