अमरावती: जिल्ह्यातील विविध जलाशयांमध्ये देश-विदेशातील पक्ष्यांचे आगमन झाले असून ऑक्टोबरमध्ये शहरालगतच्या बोरगाव जलाशय आणि आजूबाजूच्या परिसरात समुद्री बगळा आणि लालसर छातीची फटाकडी हे पक्षी आढळून आले. अमरावती जिल्ह्यात या पक्ष्यांची ही पहिलीच नोंद आहे. याशिवाय २०१३ मध्ये वान अभयारण्य वगळता लाल-पंखाचा चातक हा पक्षी जिल्ह्यात पहिल्यांदाच या परिसरात आढळून आला.

जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही येऊ लागले आहेत. हिवाळ्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. संकेत राजूरकर, प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, धनंजय भांबुरकर, प्रफुल गावंडे पाटील, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड या पक्षी छायाचित्रकारांनी या महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्या आहेत.

लालसर छातीची फटकडी हा पाणकोंबडीसदृश्य पक्षी असून याचा लालसर तपकिरी रंग फार आकर्षक दिसतो. लांब पाय गडद किरमिजी रंगाचे असून काळसर चोचेचा सुरुवातीचा भाग पिवळसर असतो. ‘झापोरनिया फूस्का’ असे शास्त्रीय नाव असणारे हे पक्षी दलदलीच्या किंवा पाणवठ्याच्या काठावर वाढलेल्या उंच गवताळ भागात वास्तव्य करून असतात.

हेही वाचा… महापालिकेतील कंत्राटी परिचारिकांची पदभरती वादात; उमेदवारांमध्ये भेद केल्याचा आरोप

समुद्री बगळा हा पक्षी दक्षिण युरोप, आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंकेसह भारताच्या समुद्र किनारपट्टीवर आढळून येतो. याला ‘ईग्रेटा गुलरीस’ असे शास्त्रीय नाव आहे. प्रामुख्याने समुद्री किनाऱ्यावर वावर असणारा हा मध्यम आकाराचा बगळा इतर बगळ्यापेक्षा याच्या राखाडी रंगामुळे फार आकर्षक दिसतो. समुद्र किनारपट्टी वगळता याच्या नोंदी कमी प्रमाणात झालेल्या दिसतात. त्यामुळे अमरावतीत झालेली ही पहिली नोंद भटक्या-स्थलांतरणाची मानली जात आहे.

लाल-पंखांचा चातक हा पक्षी भारतासह चीन, तैवान, फिलीपाईन्स आणि थायलंड या देशांमध्ये दिसून येतो. उन्हाळ्यात विशेषतः भारताच्या पूर्वोत्तर भागात हा विण घालतो व हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतो. हा चातक पक्षी महाराष्ट्रात फार तुरळक नोंदवल्या गेला आहे. याचे शास्त्रीय नाव ‘क्लमाटोर कोरोमॅन्ड्स’ असे आहे. स्थलांतरादरम्यान मध्य भारतातून जाताना अत्यंत कमी वेळात प्रवासाचे टप्पे गाठत असल्यामुळे जंगलात याच्या अस्तित्वाची जाणीव होणे कठीण असते. रायगड, ठाणे जिल्हा आणि मेळघाट लगतचा वान परिसर वगळता इतर ठिकाणी याच्या फारशा नोंदी आढळत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपुरा पाऊस, तापमानवाढीचा फटका

यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि तापमान वाढीचा फटका महाराष्ट्रासही बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर निसर्गातील महत्त्वाचे घटक म्हणजे पशू-पक्षी यांच्या अस्तित्वावर आणि वर्तणुकीवरसुद्धा याचा परिणाम होतो. त्यामुळे पक्षी-निरीक्षक व अभ्यासक यांनी यावर्षी विदर्भात पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण तसेच वैचित्र्यपूर्ण नोंदीबाबतची शक्यता हिवाळी स्थलांतरणाच्या सुरुवातीलाच व्यक्त केली होती. ती बाब खरी ठरत असल्याचे दिसत आहे.