वाशीम : काँग्रेसने अलीकडे प्रेमाचे दुकान उघडले आहे म्हणतात. पण प्रेम दुकानात मिळत नाही. त्यांचं प्रेमाचं दुकान लवकरच बंद पडणार आहे. ते नागपुरातील काँग्रेस बैठकीत दिसून आले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा समारोप पोहरादेवी येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री संजय कुटे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हेही वाचा : “महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, तर विकृतींच्या विरोधात”, रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन फडणवीस म्हणाले की, सध्या आरक्षणाची मागणी होत आहे. आम्ही त्यांचे समर्थन करतो. मात्र आरक्षण देताना कुणावरही अन्याय होता कामा नये. देशात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. मंडल आयोग होऊ दिला नाही. सध्या राज्यात जातीय सलोखा आहे. मात्र काही नेते आरक्षणाच्या नावावर जाती-जातीत तेढ निर्माण करीत आहेत. आता काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष जातीय जनगणनेची मागणी करीत आहेत. मात्र, काँग्रेस ने केलेली जातनिहाय आकडेवारी जाहीर का केली नाही ? असा सवाल फडणवीस यांनी केला.