लोकसत्ता टीम
नागपूर: ईव्हीएमव्दारे मतदान झाल्यावर मतमोजणी झटपट होते, असा समज असला तरी तो पूर्णपणे खरा नाही. मोजणी दरम्यान अनेक प्रसासकीय बाबी पूर्ण कराव्या लागत असल्याने आणि मतांची अचूक बेरीज करण्यासाठी वेळ लागत असल्याने अंतिम निकाल घोषित व्हायला संध्याकाळ होण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिलला मतदान पार पडले. एकूण ४५१० केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सर्व मतदान यंत्रे कळमना बाजारमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे.४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्यासाठी दोन्ही लोकसभा मतदारसंघांमिळून २४० टेबल लावण्यात येणार आहे. नागपूरसाठी १२० व रामटेकसाठी १२० टेबल असतील. त्यावर एकाच वेळी नागपूरच्या १२० रामटेकच्या १२० ईव्हीएमचीमधील मतांची मतांची गोळा बेरीज केली जाईल. तत्पूर्वी टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.
आणखी वाचा- यवतमाळ : २०१९ च्या तुलनेत १.७८ टक्क्यांनी वाढ, आदिवासीबहुल राळेगावमध्ये सर्वाधिक मतदान
अशा प्रकारे एक फेरी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या फेरीला सुरूवात होईल. अशा १४ ते १५ फेऱ्या पूर्ण झाल्यावर अंतिम निकाल घोषित केला जाईल. एका फेरीच्या मतमोजणीला साधारणपणे एक ते दीड तासाचा तासाचा वेळ लागतो. अनेकदा आक्षेप घेतले जातात. त्याचे निराकरण केल्यावरच पुढच्या फेरीची मोजणी सुरू होते. ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने अनेकदा मोजणी झाल्यावरही ती जाहीर केले जात नाही. त्यामुळे मतदानाचा पहिला कल पहिल्या तासात कळेल असा दावा केला जात असला तरी तो टपाल मतपत्रिकांच्या मोजणीचा राहू शकतो. संपूर्ण मतमोजणी झाल्यावर निवडणूक आयोगाच्या परवनगीनंतर निकालजाहीर केला जातो. याला संध्याकाळ होते. किंवा त्यापेक्षा जास्त वेळही लागू शकतो, असे निवडणूक शाखेतील सुत्रानी सांगितले.