गडचिरोली : ९ जून रोजी सकाळी ११ वाजता नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे (४६) हे शहीद झाले. या हल्ल्यात इतर काही अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. गिरीपुंजे हे सुकमा जिल्ह्याच्या कोटा विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या आक्रमक कारवाईदरम्यान २१ मे रोजी नक्षल्यांचा सर्वोच्च नेता व भारतीत कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याचा सुरक्षा जवानांनी चकमकीत खात्मा केला होता. या चकमकीत एकूण २७ नक्षलवादी ठार झाले होते. दरम्यान, बसवा राजूच्या स्मरणार्थ व सरकारच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ अभय याने १० जून रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सुकमा जिल्ह्यात ९ जून रोजी सकाळी नक्षलवादविरोधी अभियान राबविण्यात येत होते. या मोहिमेत कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे स्वत: जवानांसोबत पायदळ गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ नक्षलवाद्यांनी आधीच सापळा रचून ठेवलेला होता. रस्त्याच्या खोल भागात लपवलेला स्फोटक सापळा गस्ती दरम्यान अचानक उडवण्यात आला. स्फोट इतका जबरदस्त होता की, अतिरिक्त अधीक्षक गिरीपुंजे यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. कोंटाचे ठाणेप्रमुख व आणखी काही जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलीस दलाला धक्का
अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे गस्तीवर असताना जवानांना चालण्यासाठी हिंमत देत. ‘मी पुढे चाललोय तुम्ही मागे उभे राहून नका’, असे सांगणारे गिरीपुंजे आज खरेच आम्हाला सोडून पुढे निघून गेले…. अशा भावना व्यक्त करत सोबतच्या जवानांचा कंठ दाटून आला. भरल्या डोळ्यांनी त्यांनी त्यांचा मृतदेह तेथून आणला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी शहीद झाल्याने पोलीस दलाला धक्का बसला आहे.
असा झाला स्फोट..
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता नक्षलवादी स्फोटके २ फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत. त्यामुळे डिटेक्टर उपकरणांनीही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. नक्षलवादविरोधी अभियानाआधी रोड ओपनिंग केली जाते, यात या स्फोटकांचा जवानांना अंदाज आला नाही. यापूर्वी बिजापूरमध्येही अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांनी तंत्र बदलले का, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला आहे.
अनेक धाडसी मोहिमांमध्ये सहभाग
विदर्भातील मूळ रहिवासी असलेले आकाश गिरीपुंजे मोठ्या जिद्दीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. त्यांनी छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलवादविरोधी मोहिमा ययशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. ते शिस्तप्रिय, मनमिळावू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने पोलीस दल हळहळले आहे.