गडचिरोली : ओडिशावरून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप गेल्या ३ वर्षांपासून वनविभागासह गावाकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. यात पुन्हा दोन टस्कर हत्तींची भर पडली असून आठवडाभरापूर्वी या दोन हत्तींनी छत्तीसगडहून गडचिरोलीच्या कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. ११ मे रोजी सकाळच्या सुमारास या हत्तींनी मानापूर गावात धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांची भंबेरी उडाली होती. आता हे दोन टस्कर हत्ती २५ मे रोजी मध्यरात्री थेट गडचिरोली शहरात आल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्याच्या उत्तर भागात धुमाकूळ घालणाऱ्या दोन टस्कर हत्तींनी २५ मे रोजी मध्यरात्री गडचिरोली शहरातील लांजेडा परिसरात प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने झोपेची वेळ असल्याने रस्त्यांवर वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठे नुकसान टळले. हत्तींच्या प्रवेशाची माहिती मिळताच पहाटे तीन वाजताच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही हत्तींना आमिर्झा जंगलाच्या दिशेने पळवून लावले. दरम्यान, या संबंधित चित्रफित समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्याने हत्तींनी शहरात मारलेला फेरफटका चर्चेचा विषय ठरला आहे. आठवडाभरापूर्वी या दोन हत्तींनी छत्तीसगडहून गडचिरोलीच्या कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. ११ मे रोजी सकाळच्या सुमारास या हत्तींनी मानापूर गावात धुमाकूळ घातल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. यावेळी घाबरून खाली पडल्याने एक महिलाही जखमी झाली होती.
गडचिरोली : आठवडाभरापूर्वी दोन हत्तींनी कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. ११ मे रोजी हत्तींनी मानापूर गावात धुमाकूळ घातला होता. आता हे दोन टस्कर हत्ती २५ मे रोजी मध्यरात्री थेट गडचिरोली शहरात आल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली.https://t.co/2jrmCKvB4K… pic.twitter.com/7cblabQUOF
— LoksattaLive (@LoksattaLive) May 25, 2025
हत्तींचा बंदोबस्त केव्हा?
गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी घातलेल्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोबतच काहींना जीवही गमवावा लागला. ओडिशाहून स्थलांतरित झालेल्या या रानटी हत्तींच्या कळपात हत्तींची संख्या ३२ झाली आहे. मात्र, गडचिरोली शहरात आलेले दोन टस्कर हत्ती हे वेगळ्या कळपातील असून ते नुकतेच आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागोमाग पुन्हा एक कळप गडचिरोलीच्या जंगलात दाखल होऊ शकतो. यामुळे जिल्ह्यावरील हत्ती संकट अधिक गडद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. हत्तींना पळवून लावण्यासाठी कुशल मनुष्यबळ आणि साहित्य वन विभागाकडे नसल्याने ऐनवेळी त्यांचीही तारांबळ उडत असते. त्यामुळे शासनाने आवश्यक उपाययोजना करून हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
वन विभागाचे म्हणणे काय?
हत्तींच्या प्रवेशाची माहिती मिळताच त्या भागात आम्ही एक पथक पाचारण केले होते. त्यांनी या हत्तींना जंगलाच्या दिशेने पळवून लावले. नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी सांगितले.