नागपूर : भारतीय ज्ञान परंपरेत शिक्षण देण्याची विशिष्ट शैली होती. कथा, कविता तसेच खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात होते. भारतीय ज्ञान इतके सशक्त होते की युरोप, ग्रीस, पर्शिया, चीन या देशांतदेखील भारतीय ज्ञानाचा प्रचार झाला. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी सर्वत्र साक्षरता होती. मुघलांपेक्षा भारतीय ज्ञानपरंपरेचा सर्वाधिक नाश हा ब्रिटिशांनी केला, असा दावा लेखिका साहना सिंह यांनी केला.

‘मंथन’ संस्थेच्या वतीने रविवारी लेखिका साहना सिंह यांचे ‘प्राचीन भारतातील ज्ञान वारसा’ या विषयावर व्याख्यानाचे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय शिक्षण व्यवस्थेची महता सांगताना साहना सिंह म्हणाल्या, ब्रिटिश आल्यानंतर भारतीय ज्ञान परंपरेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारतीय लोकांवर अधिपत्य ठेवण्यासाठी त्यांनी शिक्षणपद्धतीत बदल केले. शरीराने भारतीय पण विचारधारेने ब्रिटिश बनवण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी धोरण केले. ब्रिटिश काळात भारतीय शिक्षणपद्धतीचे केंद्र असलेले गुरुकुल संपूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आले. संस्कृत आणि पारसी भाषेत शिक्षण दिल्याने सैनिक बंड करतील अशी त्यांना भीती होती. त्यामुळे ब्रिटिशांनी भारतीय ज्ञानपरंपरा हद्दपार करण्याचा अजेंडा राबवला.

हेही वाचा – चंद्रपूर : बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील मतभेद उघड

उठक-बैठक याला आपण शिक्षा मानतो. वास्तवात ही मेंदूला चालना देणारी यौगिक क्रिया आहे. या उठक-बैठकीचे महत्त्व लक्षात घेऊन अमेरिकेत सुपर ब्रेन व्यायाम म्हणून पेटंट करण्यात आले आहे आणि आपण हातावर हात ठेवून बसलो, असे सिंह यांनी ब्रिटिशांनी कशी आपली शिक्षणप्रणाली नष्ट केली याचे उदाहरण देताना सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

हेही वाचा – अकोला : बाळापूर व मूर्तिजापूर बाजार समितीत सहकारचा दबदबा; प्रमुख राजकीय पक्षांचे ‘हम सब एक साथ’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय ज्ञानपरंपरा हाच उपाय

वर्तमानात आपण पर्यावरणासह अनेक समस्यांचा सामना करतो आहे. याचे कारणही आधुनिक शिक्षण व्यवस्थेत दडले आहे. यातूनच आपल्यावर चुकीचे संस्कार झाले असून आज आपण अधोगतीकडे जात आहोत. यावर विजय मिळवायचा असेल तर भारतीय ज्ञानपरंपरा पुन्हा लागू करणे आवश्यक आहे. पूर्णपणे गुरूकूल पद्धती यावी असे मुळीच नाही. मात्र, त्यातील चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला समोर जावे लागेल, असे साहना सिंह म्हणाल्या.