नागपूर : एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा लवकरच होणार आहे. या परीक्षेत उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस बढती परीक्षा सराव शिबीर घेणार आहे. एस. टी. महामंडळात दोन तीन वर्षांनी सर्व पदातील कर्मचाऱ्यांसाठी खात्यांअंतर्गत बढती परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येते.

या पदातील बढती परीक्षेसाठी परीक्षार्थीना प्रश्नांचे स्वरूप अगोदरच लेखी कळवून त्यावर महामंडळ स्वतः प्रशिक्षण देते. राज्यातील इतर दुसऱ्या कुठल्याही संस्थेत असे होत नाही. या पदातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपानुसार त्यांना लिहायची सवय नसल्याने त्यांच्याकडे ज्ञान, गुणवत्ता व शिक्षण असून सुद्धा अनेकांना बढती परीक्षेत अडचणीना सामोरे जावे लागते.

हेही वाचा…यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

दरम्यान, परीक्षेसाठी उमेदवारांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांना परीक्षेचा सराव व्हावा यासाठी सराव शिबीर आयोजित करण्याचे नियोजन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसने केल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. मुंबईतील दादर येथे शुक्रवारी शिबीर झाले. श्रीरंग बरगे म्हणाले, एसटीला ७६ वर्षे झाली. एसटी वाढीत कर्मचाऱ्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ लिपिकांना महामंडळाची खडानखडा माहिती आहे. या पदातील साधारण साडेसहा हजार कर्मचारी ही बढती परीक्षा देणार असून एसटी महामंडळाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी परीक्षा आहे.

हेही वाचा…मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या रविवारी ही परीक्षा राज्यभर होत आहे. ही परीक्षा एसटीच्या दैनंदिन कामाच्या आधारावरच घेतली जाते. दररोजच्या कामामुळे ते कर्मचाऱ्यांना अवगत असले तरी चालक व वाहक व यांत्रिकी कर्मचारी या पैकी चालकाचे काम हे वाहन सुरक्षित चालविणे हे आहे. तिथे कुठेही लिहिण्याची गरज पडत नाही. वाहकाच्या कामाचे स्वरूप पाहता पूर्वी तिकीट पंचिंग केले जायचे आता मशीन मधून तिकीट दिले जाते. यांत्रिकी कर्मचारी तर हातात पाना घेऊनच आयुष्यभर काम करीत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रवर्गातील वरच्या पदाचा अनुभव, ज्ञान, गुणवत्ता तसेच काहीकडे मोठे शिक्षण असूनसुद्धा लिहायची सवय नसल्याने बढती परीक्षा देताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मनोबल व मनोधैर्य वाढविण्यास मदत व्हावी या चांगल्या उद्देशाने सराव शिबीर आयोजित केल्याचे बरगे यांनी सांगितले.